-माधुरी तळवलकर
शिकोड म्हणजे आपली मुळं. आपली मुळं आपल्या भूमीत, गावात, घरात असतात. घर म्हणजे नुसतं घर नसतं. त्याला चिकटलेल्या आठवणी, सुखदुःखं, नातेसंबंध हे सारं त्या घरात सामावलेलं असतं आणि म्हणून प्रत्येकाला आपलं घर, तिथला परिसर प्रिय असतो.
देशाची फाळणी झाली तेव्हा अनेकांना आपलं प्रिय घर सोडून दुसऱ्या देशात पळ काढावा लागला. अशीच दोन कुटुंबं आहेत. सख्खे मित्र. पण बंगाली मोहनचं घर पाकिस्तानात गेलं. फाळणीनंतर त्याला तिथं राहणं बरं वाटेना. आपला बाडबिस्तरा घेऊन तो भारतात त्याच्या करीम नावाच्या मित्राकडे आला. पाहतो तर, तो करीमही पाकिस्तानात जाण्याच्या तयारीत. दोघेही एकमेकांना भेटतात. प्रेमाने बोलून घेतात आणि ठरवतात की, आपण एकमेकांच्या घरात राहू. करीमने पाकिस्तानात जाऊन मोहनच्या घरात राहावे; त्या घराची जपणूक करावी आणि मोहनने हिंदुस्थानात राहून करीमच्या घराची निगराणी करावी.
या गोष्टीला आता चाळीस वर्षे उलटली आहेत. फिल्मच्या सुरुवातीलाच मोहनबाबू राहात असलेला सुरेख बंगला दिसतो. मोठे अंगण, बाग. लोक विचारायला येताहेत, बंगला विकायचाय का? अपार्टमेंटमध्ये तुम्हाला तेवढी जागा देतो. हा आता वृद्ध झालेला. सुनेला म्हणतो, “घर सिर्फ घर तो नहीं होता ना… किसीके जडोंको हम संभाल रहे हैं!’
…आणि काय आश्चर्य! अचानक खुद्द करीमचाचा, कॉलेजवयीन नातवंडांना घेऊन, आपल्या जुन्या घरी येऊन थडकतात. दोघे मित्र उराउरी भेटतात. दोघांची नातवंडेही एकाच वयाची. मस्त जमते सगळ्यांचे. चाळीस वर्षांनी भेटलेले दोघे आजोबा जुन्या आठवणी काढतात. ज्या बेडरूममध्ये ते बसलेले असतात, तिथेच करीमचाचांना पहिलं बाळ झालेलं असतं. मोहन म्हणतो, “माझी सून बाळाला घेऊन याच बेडवर पहिल्यांदा झोपली. म्हणजे या खोलीत मी आजोबा झालो आणि तू बाप…’ मग करीमचाचा म्हणतात, “तुही एकदा तिथं येऊन तुझं घर बघून घे. मुलगा विकायचं म्हणतोय.’
दोघे घराभोवतीच्या झाडाझुडपांमधून फिरता फिरता गप्प होतात. काळ बदलतोय याची दोघांनाही जाणीव होते. दोघेही समजून घेतात, आता ही तरुण मुलं तरी काय… ती तर कुठेकुठे जातील, राहतील. शेवटी आपली मुळं आपल्याबरोबरच असतात. आपले संस्कार, शिकवण हे आपण जिथे जाऊ तिथे घेऊन जातो. ही मुलंही तशीच जातील, रुजतील. पिढ्या बदलत राहतील. पण संस्कृती? ती टिकून राहते. पुढे वाहत राहते.
सुरुवातीला हळवे, भाववश असलेले वातावरण शेवटी शेवटी समंजस होते. काळाचे बदल स्वीकारायला हवेत हे सत्य दोघेही मान्य करतात. मात्र, त्यात हळहळ, पश्चाताप मुळीच नाही. एक शांत समजूतदारपणा आहे. ही हृदयस्पर्शी फिल्म मनावर प्रसन्न शिडकावा करते.