कागदोपत्री पुरावे असल्याचा केला दावा
अहमदाबाद – गुजरातमधल्या बनसकांठा जिल्ह्यातील एका गावात पाचशे गावकऱ्यांच्या नावाने बॅंकेमध्ये परस्पर खाते उघडून त्यांच्या खात्यावर मनरेगाची आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची मजुरी जमा करून मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आमदार जिग्नेश मेवानी यांनी केला आहे. बलुंद्रा गावात हा प्रकार झाल्याची माहिती त्यांनी आज पत्रकारांना दिली.
कोविडमुळे अनेक गावकरी त्रस्त झाले असून त्यांना कोणताच रोजगार उरला नसल्याने ते मनरेगामध्ये आपले नाव नोंदवण्यास गेले त्यावेळी त्यांना आपले नाव आधीच कोणी तरी नोंदवले असून आपल्या नावावर बॅंक खात्यात रोजंदारीची रक्कम नियमित जमा होत गेल्याचेही त्यांच्या लक्षात आले. अशी किमान पाचशे बोगस खाती तेथे उघडण्यात आली आहेत.
गुजरातमधील अन्य खेड्यातही अशाच प्रकारचा मोठा घोटाळा झाला असल्याचा आपला संशय आहे, असे ते म्हणाले. आपल्या मतदारसंघातील आणखी एका गावातही असाच प्रकार घडल्याचे आपल्याला समजले आहे असे त्यांनी सांगितले.
बलुंद्रा गावातील पाचशे गावकऱ्यांच्या नावावर जमा झालेले पैसे एटीएममधून काढून घेण्यात आले असून गेली आठ ते नऊ वर्षे हा प्रकार सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या एका गावातच किमान आठ ते नऊ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असावा असा त्यांचा आरोप आहे. सरकारी योजनेचा लाभ देतो असे सांगून गावकऱ्यांचा आंगठे घेण्यात आले आणि त्यांच्याकडून आधार कार्डाच्या झेरॉक्सही घेण्यात आल्या. त्या आधारे त्यांच्या नावाने बॅंकेत खाती उघडली गेली आणि त्यातून हा भ्रष्टाचार झाला असा आरोप मेवानी यांनी केला.
या साऱ्या घोटाळ्याचे कागदोपत्री पुरावे आपण जमवले असून त्या प्रकरणात आपण पोलीस तक्रार दाखल करणार आहोत, असेही मेवानी यांनी पत्रकारांना सांगितले. या पत्रकार परिषदेला गुजरात प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल हेही उपस्थित होते.