बहु भाग्याने प्राप्त झालेल्या मानवी जन्माची खरी सार्थकता साध्य होण्यासाठी, एक जीव म्हणून आपण जन्मास आल्यावर त्या जीव दशेकडून शिव दशेकडे जाण्यासाठी मांडलेला संसार, प्रपंच न सोडता न मोडता त्या संसार प्रपंच्याचा नाही तर त्यातल्या गुंतीचा त्याग करून तो ईश्वर कसा जोडायचा, आपणच आपल्या जन्माची खरी सार्थकता कशी करायची? या कामी जीवनात द्रष्टेपणाने विवेक, विचार, वाचन, श्रवण आणि सत्संगाच्या सहायाने जे अमृतकण वेचले त्या अमृत कणांचा आस्वाद घेत असताना खरोखरच खूप मोठा आनंद मिळतो.
बाहेरच्या वस्तूतून, इतर कोणा व्यक्तीकडून नव्हे, तर आपल्याच अंतरीच्या त्या साक्षी परमात्म्याला ओळखून स्वानंद मिळतो, तो काय आणि कसा हे अनुभवता येते. साधू, संत आणि सद्गुरूंच्या त्या खर्या खुर्या ज्ञानार्जनाने दृष्टीची कवाडे उघडली गेली आणि –
मीच माझा शोध घेता, तो मला गवसून गेला। आत माझ्या तोच आहे हे मला सांगून गेला ॥
ही त्याच्या साक्षीत्वाची ओळख सुखवून जाते. तो आणि मी अलिप्त नाही हे सांगून गेल्यावर नकळतच अभिन्नत्वाचं, देव भक्ताचं नातं जोडलं गेलं. त्याच्याच साक्षीने त्याच्याच आठवणीने शेवटचा क्षण गोड व्हावा यासाठी त्यालाच प्रार्थना करताना मन म्हणू लागेल,
इतना तो करना स्वामी। जब प्राण तनसे निकले । गोविंद नाम लेके, तब प्राण तनसे निकले ।
ही आणि अशी शेवटच्या क्षणी त्याची आठवण व्हावी. त्याचे गोड नाम मुखी यावे, त्याची लोभस मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहावी यासाठी त्यालाच ही अशी प्रार्थना करावीशी वाटली. कारण मनुष्याच्या शेवटच्या क्षणी त्याचे मन हे जिथे जाते, रमते, गुंतते तीच गती त्याला पुढे मिळते हे तर भगवंतांनीच गीतेत सांगून ठेवलेले आहे. म्हणूनच तुकोबाच्या भाषेत त्या दीनदयाघनाकडेे हेच मागायचे की-
हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥
त्या शेवटच्या क्षणी तुझा विसर का नको, का तुझे नाम शेवटी मुखी असावे, का तुझी मूर्ती डोळ्यासमोर असावी, तर देवा! आजवर अनेक जन्म मरणाचे सोहळे भोगले. आता कृपावंत हो आणि मुक्तीचा सोहळा भोगू दे. तुझ्या बोधामृताच्या अमृतकणांनी जीव शिव ऐक्याचा मेळ घडू दे. ही जन्मोजन्मीची जन्म मरणाची बेडी निदान आता तरी तुटू दे.