– डॉ. दत्ता देशकर
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासह देशभरात आणि जगभरामध्ये पाण्याचा प्रश्न तीव्र बनताना दिसत आहे. पाण्यामुळे तिसरे महायुद्ध होऊ शकते, अशी चर्चा काही वर्षांपूर्वी ऐकायला मिळायची. यंदाच्या जागतिक जलदिनाची थीमही ‘शांततेसाठी पाणी’ अशी होती. शांतता असेल तर आणि तरच जगाला स्थैर्य आणि भरभराट प्राप्त होवू शकते. जलसाठे प्रदूषित असतील वा पाण्याचे असमान वितरण असेल तर जगात शांतता नांदू शकत नाही, हा त्यातील मतितार्थ होता. आज महाराष्ट्रासह कर्नाटकादी राज्यांमध्ये येणारा मे महिना आणि जून महिन्यातील मान्सूनचा वर्षावर होईपर्यंतचा काळ कसा काढायचा, याच्या चिंतेत येथील समाजमन आहे. टँकरचे ङ्गेरे वाढत चालले आहेत. लांब अंतरावरुन पाणी आणणार्यांची गर्दी वाढत आहे. ही स्थिती चिंताजनक आहे.
जगातील 3,000,000,000 जनता दुसर्या देशातून आलेल्या पाण्यावर अवलंबून आहे. जगातील 153 देश हे शेजारी राष्ट्रांशी नद्या, तलाव वा जलधर वाटून घेत असतांना त्यापैकी फक्त 24 देश असे आहेत की जे शेजारी राष्ट्रांशी पाण्याबाबत सहकार्य करार केलेले आहेत. प्रश्न एवढ्यावरच थांबलेला नाही तर वाढती लोकसंख्या आणि हवामान बदल या दोन कारणांनी समस्या अधिक बिकट बनली आहे. आणि या सर्व बदलत्या परिस्थितीत आपल्याला शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठायचे आहे.
ही निश्चितच एक तारेवरची कसरत आहे. जगातील पाण्यासंबंधात कोणकोणते प्रश्न डोके वर काढत आहेत याची यादीच तयार करायचे ठरवल्यास हवामान बदलामुळे पाणी पुरवठ्यात होणारी अनियमितता, पूरांमुळे आणि दुष्काळांमुळे येणार्या आपत्ती, खालावत जाणारी जैव विविधता, संकटांची तीव्रता कमी करण्यासाठी अर्थप्रबंधन, पाण्यामुळे महिलांवर येणारे ताणतणाव, पाण्याशी निगडीत मानवी हक्क, परदेशांतून येणार्या जलपुरवठ्यामुळे निर्माण होमारे ताणतणाव, शहरीकरणाशी निगडीत पाणी प्रश्न, अन्न आणि शक्ती सुरक्षितता, वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवण्यात येणार्या अडचणी या सारख्या प्रश्नांचा उल्लेख करावा लागेल.
या यादीतील प्रत्येक प्रश्न हा एखाद्या विध्वंसक बाँबसारखा आहे. त्याचा स्फोट केव्हा होईल हे आपण सांगू शकत नाही. पण तो झालाच तर त्याचे परिणाम जागतिक शांततेवर झाल्याशिवाय राहणार नाहीत. जगात आधीच रशिया आणि युक्रेन व इस्त्राइल आणि हमास ही दोऩ युद्धे चालू आहेत. त्यात पाण्यामुळे अधिक भर पडायला नको असे प्रत्येकाला वाटत असले तरी पाण्यासाठी पराधीन असलेला माणूस कधी बिथरेल व शांतता भंग करेल याचा अंदाज करणेही कठीण आहे.
या संदर्भात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित करण्याचा मोह टाळता येत नाही. ही समस्या निर्माण करणारा माणूस या संबंधात काहीच हालचाल का करत नाही हा प्रश्न विचारला गेलाच पाहिजे. माणसाने या संदर्भात विचार केला नाही तर कोणतेही सरकार हा प्रश्न सोडवू शकत नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हा प्रश्न सोडवणे तर राहूच द्या तो अधिकाधिक गंभीर कसा बनत जाईल याकडे माणूस जास्त लक्ष देत आहे असे म्हंटल्यास चुकीचे ठरु नये. दिवसेंदिवस माणसाचा पाण्याचा हव्यास वाढत आहे. अधिक पाणी लागणारे नवनवीन मार्ग तो सध्या शोधत आहे. अशामुळे पाणी संकट दूर जाण्याचे ऐवजी अधिकाधिक जवळ येत चालले आहे.
या दृष्टीकोनातून पाहता आपल्या कर्तव्यापासून दूर जाणार्या माणसाला किमान थोडी तरी बोच निर्माण होणे गरजेचे आहे. माणूस म्हणून मी जर या समस्येसाठी जबाबदार असेन तर मला स्वतःला त्यासाठी शिक्षा करावीच लागेल. दुसर्या ग्रहावरुन कोणीतरी येवून ही समस्या सोडवेल अशी जर तुमची समजूत असेल तर तुम्ही मूर्खांच्या नंदनवनात राहात आहात. तुम्ही निर्माण केलेला प्रश्न तुम्हालाच सोडवायचा आहे हे जितक्या लवकर तुमच्या लक्षात येईल तितके बरे.
या संदर्भात मी काय करु शकतो ? मी पाणी काळजीपूर्वक वापरणार. ते मी वाया घालवणार नाही. ते मी प्रदूषित होवू देणार नाही. दुसर्याचाही त्या पाण्यावर हक्क आहे याची मी जाणीव ठेवीन. मी जमिनीतून विनाकारण पाणी उपसणार नाही. मी जर जमिनीत पाणी भरले नसेल तर मला पाणी उपसण्याचा हक्क नाही. मी स्वतः जलसाक्षर होईन आणि व इतरांनाही जलसाक्षर करीन. नद्या व इतर जलसाठे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करीन. त्यांचेवर आक्रमण होवू देणार नाही.
पाण्यासाठी कोणताही सामाजिक तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेईन. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी माझाही खारीचा वाटा असेल. उद्याचे जीवन मला सुसह्य करायचे असेल तर माझ्याकडून मी पाणी प्रश्नाला सोडवण्याचा कसोशीने प्रयत्न करीन. या पाण्यावर निव्वळ माझाच नाही तर पुढच्याही पिढ्यांचा हक्क आहे याची मला जाणीव आहे. वर दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करीन अशी शपथ घेण्याची गरज आहे.