भगवान बुद्धांचा जन्म, त्यांना बुद्धत्व प्राप्ती आणि महापरिनिर्वाण या त्यांच्या जीवनातल्या महत्त्वपूर्ण घटना वैशाखी पौणिमेला घडाव्यात हे एक उद्भुत सत्य आहे. वैशाखी पौर्णिमेला त्यांना झालेल्या ज्ञानप्राप्तीने जगातील अंधःकारमय दुःख पटल प्रकाशमान झाले. चार आर्य सत्याच्या व यातून पुढील आर्य अष्टांगिक मार्गाची “धम्मदेसना’ त्यांना जनसामान्याच्या कल्याणासाठी मांडावयाची होती आणि म्हणूनच यासाठी त्यांनी “धम्मदेसना’ क्रमणाला प्रारंभ केला.
मानवी कल्याणाच्या सुखासाठी भगवान बुद्धांनी कठोर परिश्रम, खडतर तपश्चर्येचा मार्ग अवलंबिला. सर्व बंधनातून मुक्त होऊन बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर आपल्या प्रथम “धम्मदेसने’ला प्रारंभ करण्यापूर्वी त्यांना प्रश्न पडला. प्रथम मी धम्मदेसना कोणाला करावी? जो मनुष्यमात्र शुद्ध, पवित्र, सुंदर आणि सुखाने विनित आणि राग, लोभ, द्वेष यांनी मुक्त आहे आणि जो माझा धम्म जाणू शकेल, अशा व्यक्तीकडेच प्रथम गेले पाहिजे.
भगवंताच्या दृष्टीपुढे प्रथम आलार-कालामचे चित्र द्रगोच्चर झाले. त्यांच्या समवेत आपल्या तपस्येतील काही कालखंड त्यांनी व्यतित केला होता, परंतु त्यांचे निधन झाल्याचे समजले. दुसरी व्यक्ती खुद्दक रामपुत्र त्यांच्या नजरेपुढे आले परंतु त्यांचाही देहांत झालेला होता. हे लक्षात आल्यावर पंचभद्रिय वर्गातील जनमसमुहाला प्रथम धम्मदेसना करण्याचे त्यांनी निश्चित केले. त्यांच्यामते, हे पंचभद्रिय चरित्रवंत, कुशलपंडित, बंधनापासून मुक्त आणि मोक्षाच्या प्रतिक्षेत असल्याने त्यांचा प्रथम शोध घ्यावा. भगवंताला समजले ते यावेळी वाराणसी जवळील ऋषीपतनमधील मृगदाव येथे विहार करीत आहे. मग ते मगध देश, काशी, जनपद गया या मार्गाने वाराणसी या महानगरी पोहोचले.
भगवंत पंच भद्रवर्गियांच्या जसजसे जवळ येऊ लागले तशी सर्वत्र प्रकाशमान आभा पसरली. भगवान बुद्धांच्या मुखमंडलावरील तेजपुंज प्रभा पाहून हे पंचवर्गीय प्रभावित झाले. सर्वांनी उठून भगवान बुद्धांना विनम्र अभिवादन केले. भगवंत म्हणाले, हे भिक्षुहो, मी तुम्हाला माझ्या साक्षात्कारीत धम्माची धम्मदेसना करू इच्छितो. ऐका, आचरण करा, लक्षपूर्वक माझा उपदेश जो सद्सद्विवेकवादी आहे, त्याचा अवलंब केल्यामुळे तुम्ही निर्मळ चित्त, प्रज्ञेचा अनुभव घ्याल. या पंच भद्रवर्गियांना प्रथम त्यांनी धम्मदेसना दिली. बुद्धांनी आपल्या साक्षात्कारीत धम्माचा या पंच भद्रवर्गियांना प्रव्रज्ज, उपसंपदा दिली. त्यांनी तथागतांच्या चरणी नतमस्तक होऊन “सम्यक’ “सम्बुद्ध’ म्हणून भगवान बुद्धांचा गौरव केला.भगवंतांची ही प्रथम धम्मदेसना पुढे निर्माण झालेल्या विश्व विशाल भिक्षुसंघाच्या धम्म प्रवर्तनात झाली.
“प्रत्यत्यसमुत्पाद’ या तत्त्वज्ञानाबरोबरच “चार आर्यसत्य’ या तत्त्वज्ञानाची भगवान बुद्धांनी मांडणी केली. सम्यकदृष्टी, सम्यकसंकल्प, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हे आर्य अष्टांगिक मार्ग होत. तसेच दुःखाचे मूळ कारण म्हणजे मानवाची असलेली तृष्णा होय. तृष्णेमुळेच दुःख उत्पन्न होते. तृष्णेचा नाश करण्यानेच मनुष्य दुःखातून मुक्त होतो. तृष्णेच्या नाशाचा मार्ग म्हणजे आष्टांगिक मार्ग. “मध्यम मार्ग’ हे बुद्धांच्या धम्माचे प्रुमख सूत्र आहे.
ऍड. सु. बा. वाघमारे