पुणे – आपल्याकडे खाद्यतेलाचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चटका बसला आहे. अशा स्थितीत अन्य देशांतून आपण तेल आयात वाढवत आहोत. दुसरीकडे जगातील सर्वांत मोठा पाम तेल उत्पादक देश असलेल्या इंडोनेशियात तेथील सरकार या तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा तयारीत आहे. तसे झाल्यास त्याचा तडाखा भारताला बसून खाद्यतेल आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.
युद्धाचाही फटका
गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेल महागले होते. त्यात रशिया-युक्रेन युद्धस्थितीमुळे सूर्यफूल आणि सोयाबील तेलाचे भाव आधीच वाढलेले आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा असताना इंडोनेशियाच्या भूमिकेमुळे तेल महागण्याची चिन्हे आहेत.
सरकारने निर्णय बदलला
मार्च 2021 मध्ये इंडोनेशियामध्ये एक लिटर ब्रॅंडेड पाम तेलाची किंमत 14,000 इंडोनेशियन रुपये होती. तीच आता 22,000 पर्यंत वाढली आहे. तेथील सरकारने निर्यातदारांना 20 टक्के तेल देशांतर्गत बाजारात विकणे बंधनकारक केले होते. त्यात वाढ करत आता हे प्रमाण 30 टक्क्यांवर नेले आहे.
भारताने आयात वाढवली
जागतिक बाजारपेठेत भारत हा खाद्यतेलाचा सातत्याने आघाडीवरील आयातदार देश आहे. पण रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या आयातीवर मर्यादा आल्या. त्यामुळे भारताने पाम तेलाकडे मोर्चा वळवला आहे. मार्चमध्ये भारताने 5 लाख 39 हजार 793 टन पाम तेल आयात केले. तर, फेब्रुवारीत हेच प्रमाण 4 लाख 54 हजार 794 टन इतके होते.
57% भाववाढ
इंडोनेशियात पाम तेलाचा तुटवडा इतका मोठा आहे, की तेथील सरकारने याबाबत अपेक्षाही केली नव्हती. पण, आता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय रिपोर्टनुसार तेथे खाद्यतेलाच्या भावात 57 टक्के वाढ झाली आहे.
आता पर्याय काय?
आंतरराष्ट्रीय पातळीवर खाद्यतेलाचे भाव सातत्याने वाढत आहेत. त्यातच आता इंडोनेशियातील स्थिती बिकट होत आहे. त्यामुळे भारतापुढे आता मलेशियाचा पर्याय उपलब्ध आहे. येत्या काळात त्या देशाकडून पाम तेल आयात वाढवली जाऊ शकते. त्यामुळे भारतातील खाद्यतेलाची भाववाढ थोपवण्याचे प्रयत्न होतील.
पाम तेलाची स्थिती (वार्षिक)
230 लाख टन : भारताला गरज
130 ते 150 लाख टन : केली जाणारी आयात
60 % तेल : इंडोनेशियातून आयात
40 % तेल : मलेशियातून आया