पुणे –देशातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयुईटी) माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे सूचित केले आहे. आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या विषयांमध्ये पूर्णवेळ पदवी मिळवण्यासाठी मुभा दिली आहे. त्याची अंमलबजावणी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. यामुळे प्रवेशित विद्यार्थी संख्या वाढणार असून, शिक्षणसंस्थांना आर्थिक बळ मिळणार आहे.
“यूजीसी’चे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी एकाचवेळी विद्यार्थ्यांना दोन पदवी घेता येणार असल्याची घोषणा केली. याबाबतचा निर्णय गेल्याच वर्षी घेण्यात आला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. “यूजीसी’च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच कुमार यांनी या निर्णयाची अंमलबजावणीची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्याबाबत “यूजीसी’कडून लवकरच मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केले जाणार आहे.
केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना नवनवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. एका विद्यार्थ्याला एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या विषयांच्या पदव्या प्रत्यक्षरित्या मिळवता येतील. या पदव्या एकाच विद्यापीठातून किंवा दोन वेगवेगळ्या विद्यापीठांतूनही घेता येतील. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष म्हणजे ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने एका वेळेस दोन पदव्या घेण्याची मुभा राहील.
शिक्षणसंस्थांना उभारी मिळणार
“यूजीसी’चा हा निर्णय शिक्षण संस्थांना फायदेशीर ठरणारा आहे. कारण विद्यार्थ्यांना दोन अभ्यासक्रमास एकाचवेळी कोणत्याही विद्यापीठ तथा महाविद्यालयातून प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची पसंती राहील. मात्र, त्यावरून विद्यार्थ्यांचे शुल्कावरून शोषण होणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यासाठी “यूजीसी’ने अभ्यासपूर्वक नियमावली तयार करणे आवश्यक असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या पदवीसाठी काही ठळक मुद्दे
विषय निवडण्याची कोणतीही सक्ती नाही.
दोन्ही पूर्णवेळ अभ्यासक्रम असतील.
एकाच अथवा वेगवेगळ्या विद्यापीठातही प्रवेश घेता येणार
एक अभ्यासक्रम नियमित, तर दुसरा दूरशिक्षण अथवा ऑनलाइन
एकीकडे पदवी आणि दुसरीकडे पदव्युत्तर कोर्स अशी तरतूद नाही
यूजीसीकडून या निर्णयांसाठी विद्यापीठांवर सक्ती नसेल
यूजीसीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्यांना हवं असलेल्या अन्य विषय अथवा अभ्यासक्रमातून पदवी घेण्याची सोय होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक करिअर विस्तार करण्याची संधी आहे. याद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रात अथवा विषयातील ज्ञान आत्मसात करता येणार आहे.
– डॉ. संजीव सोनवणे, अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ