नवी दिल्ली – दिल्लीच्या मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने साधारण दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. केजरीवाल यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या वेळी ईडीचे वकिल एस. व्ही. राजू यांनी मोठे विधान केले आहे. आमच्याकडे या प्रकरणाच्या मनी ट्रेलचे पुरावे असल्यामुळे ईडी आम आदमी पार्टीची मालमत्ताही जप्त करू शकते असे राजू यांनी म्हटले आहे.
ॲडिशनल सॉलिसिटर जनरल अर्थात एएसजी असलेले राजू म्हणाले ईडी आम आदमी पार्टीच्या काही मालमत्ता जप्त करणार आहे. योग्य वेळी ही कारवाई केली जाईल. त्यांनी जर अशी जप्तीची कारवाई केली तर सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आपसाठी हा सगळ्यांत मोठा हादरा असेल.
दरम्यान, आपल्याला झालेली अटक राजकीय द्वेषातून प्रेरित असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. मात्र आम्ही केजरीवाल यांना नोव्हेंबर २०२३ मध्येच नोटीस पाठवली होती. त्यावेळी कोणती निवडणूकही नव्हती. जेंव्हा ईडीकडून पहिले समन्स पाठवण्यात आले होते तेंव्हा मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा हवाला देत केजरीवाल यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला होता.
अशात आज उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी एएसजी राजू यांनी ईडीची संभाव्य कारवाई आणि आपकडून केला जाणार तर्क याच्या अनुशंगाने उत्तर दिले आहे. ते म्हणाले की जर आता आम्ही पक्षाची मालमत्ता जप्त केली तर ते (आप) असे म्हणतील की आम्ही निवडणुकीच्या वेळीच हे सगळे केले. जर आम्ही काही केले नाही तर म्हणतील पुरावे कुठे होते?तूर्त आम्ही या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहोत.
कोणताही ठोस पुरावा नाही
केजरीवाल यांनी अटकेला आणि कोठडीला आव्हान दिले आहे. त्यांची बाजू मांडताना त्यांचे वकिल अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की तपास संस्थांकडे केजरीवालांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. त्यांना निवडणुकीपासून लांब ठेवण्यासाठीच अटक केली गेली आहे. ईडीने लेखी स्वरूपात काहीच दिले नव्हते व त्यांचे सगळे समन्स बेकायदेशीर होते. पहिले मत पडण्याच्या अगोदरच केजरीवाल यांच्या पक्षाची अनेक शकले करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अपमानित करणे आणि बेइज्जत करणे हा एकमेव हेतू आहे.