नगर – लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आतापासून कंबर कसली आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे हेच संभाव्य उमेदवार असतील असे गृहित धरून त्या विरोधात सक्षम व प्रभावी उमेदवार देण्याचा आज मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. आतापासून उमेदवार निश्चित केला तर त्याला तयार करण्यास मोठा अवधी मिळेल. त्यामुळे लवकरच उमेदवार निश्चित करण्याचा आग्रह जिल्ह्यातील नेत्यांनी या बैठकीत धरला.
दरम्यान, आमदार नीलेश लंके यांचे नाव लोकसभेसाठी आघाडीवर असले तरी याच्या नावाबरोबरच आणखी काही नावे देखील या बैठकीत चर्चेतून समोर आली आहे. त्यात माजी आमदार अरूण जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या नावांचीही चर्चा झाली.
या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधीपक्ष नेते अजित पवार, आमदार छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित होते. आजच्या बैठकीत संभाव्य उमेदवारांवरही चर्चा झाली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. त्याबरोबर या मतदारसंघात पक्षाचे चार आमदार आहे. त्यामुळे या मतदारसंघात पक्षाचा उमेदवार विजयी होण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
राष्ट्रवादीने ज्या लोकसभा मतदारसंघात पक्षाचे जास्त आमदार आहे. ती जागा जिंकण्याची रणनिती आखण्यात आली आहे. त्या दृष्टीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लक्ष देण्याचे ठरले आहे. या बैठकीला आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार चंद्रशेखर घुले, घनःश्याम शेलार, अंबादास गारुडकर, राजेंद्र कोठारी उपस्थित होते. चौंडी येथील कार्यक्रमाच्या तयारीमुळे आमदार रोहित पवार आणि कुटुंबातील लग्न समारंभामुळे आमदार निलेश लंके या बैठकीला उपस्थित नव्हते.
जिल्हा बॅंकेत मते फुटल्याप्रकरणी नाराजी
जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संचालकांची मते फुटली होती. या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र पक्षाने याकडे दुर्लक्ष केले. चौकशी झाली नाही, कोणाची मते फुटली ती नावे देखील बाहेर आली नाही. याबद्दल जिल्ह्यातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत पक्ष लवकरच निर्णय घेईल, असे यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत पाच मते फुटली. ही मते नेमकी कोणीची फुटली याबाबत पक्षाच्या युवकांतर्फे संबंधित तालुक्यात आंदोलन करून ते संचालक अप्रत्यक्षरित्या उघड केले होते. अजित पवार यांनी या संचालकांच्या दहा पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करण्याचे जाहीर केले होते. पण कारवाई झाली नाही.