कराड (प्रतिनिधी) – सगेसोयर्यांबाबत अध्यादेश काढण्याचे आश्वासन देऊन शासनाने मराठा समाजाची फसवणूकच केली असल्याची संतप्त भावना कराडमधील मराठा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे. सत्ताधार्यांसह विरोधकांना धडा शिकवण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून एक ते दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार मराठा समाज बांधवांनी केला आहे.
कराड तालुक्यातील मराठा समाज बांधवांची गुरूवारी सायंकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मनोज जरांगे-पाटील यांना बदनाम करण्यासाठी खोटेनाटे आरोप केले जात आहेत. राजकीय षडयंत्राद्वारे मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून राज्य शासनाने एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय शासनाने त्वरित मागे घेतला पाहिजे.
कुणबी – मराठा व मराठा – कुणबी हे एकच असल्याचे ऐतिहासिक काळापासून पुरावे आहेत. त्यानंतरही ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही. दोनदा रद्द होऊनही पुन्हा एकदा स्वतंत्रपणे आरक्षण देत मराठा समाजाची दिशाभूल करण्यात आली आहे, अशा प्रकारे संतप्त भावना मराठा समाज बांधवांनी या बैठकीत व्यक्त केल्या.
सत्ताधारी व विरोधी पक्षांचे नेते केवळ बघ्याची भूमिका घेत मराठा समाजाला न्याय व हक्कांपासून वंचित ठेवत आहेत. सगेसोयर्यांबाबत तातडीने अध्यादेश न काढल्यास लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात कराड तालुक्यातील प्रत्येक गावातून दोन ते तीन उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
त्याचबरोबर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना मराठा बांधवांकडून आपआपल्या गावात मत मागण्यास आल्यास तीव्र विरोधाचा सामनाही करावा लागेल, असा इशाराही मराठा समाज बांधवांनी दिला आहे