देहूगाव, ( वार्ताहर) – देहू – देहूरोड या पाच किमी अंतरातील रस्त्यावर खड्डे झाले असून त्यामुळे वारंवार अपघात घडत आहे. देहू व देहूरोड पालखी मार्गावर सुमारे १७३ हून अधिक मोठमोठे खड्डे आहेत. अपघात घडल्यानंतर गंभीर जखमी व त्यांचे नातेवाईक लोकप्रतिनिधींच्या नावे शिव्या शाप देत आहेत. रस्ता कधी करणार ? असा प्रश्न ही करीत आहे
तीर्थक्षेत्र देहू आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील मुंबई – पुणे महामार्गाला जोडणाऱ्या देहू व देहूरोड पालखी मार्गावर सुमारे १७३ हून अधिक मोठमोठे खड्डे पडले आहेत. लष्करी भागामध्ये असणारा ३ किमीच्या अंतरामध्ये सुमारे १३२ हून अधिक खड्डे आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा असणारे रस्त्याचा किनारा तुटलेले असून किनाऱ्या लगत ही मोठमोठे खड्डे पडले आहेत.
या मार्गावरील पथदिवे अनेक वेळा बंद असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी खड्डे चुकवताना किंवा अंधारात खड्डा दिसून न आल्याने दुचाकी व चार चाकी वाहने आदळून अपघात घडत आहेत. याकडे प्रशासनाने मात्र, सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.
अपघातात दांपत्य जखमी
दुचाकीवरून जात असलेल्या एका जोडप्याचे चिंचोली येथील शनी मंदिराजवळ असणाऱ्या मोठ्या खड्ड्यामध्ये दुचाकी आदळून अपघात घडला. पती- पत्नी दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झाले होते. खड्डालगतच्या दगडांमुळे दुचाकीवरून उडूनखाली पडलेल्या महिलाच्या पायाचे दोन्ही गुडघे, हाताचे कोपरे, तोंडाला गंभीर दुखापत झाली. तिच्या पतीला ही दुखापत झाली होती.
अपघात घडल्यावर संबंधित महिलेने विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करणारे लोकप्रतिनिधी आणि उपोषण, आंदोलन करणाऱ्यांना हा रस्ता, हे खड्डे दिसत नाही का? ते कधी जागे होतील आणि रस्ते करतील? असा सवाल केला होता. दरम्यान एका रिक्षा चालकाने अपघातग्रस्तांना रिक्षातून रुग्णालयात दाखल केले.
रस्ता कोण करणार?
देहू – देहूरोड पालखी मार्ग असणारा पाच किलोमीटरच्या मार्गामध्ये देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील लष्करी तीन किलोमीटर आणि दोन किलोमीटर अंतर देहू नगरपंचायत हद्दीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्याकडे असणारा रस्ता नक्की करणार कोण ? असा प्रश्न आहे.
बीज सोहळ्यापूर्वी दुरुस्ती करा
श्री संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा अर्थात बीज सोहळा महिनाभरावर येऊन ठेपला आहे. राज्यातून लाखो भाविक याच मार्गाने सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तीर्थक्षेत्र देहू येथे येतात. त्यामुळे हा नादुरस्त रस्ता व नादुरूस्त पथदिवे बीज सोहळ्यापूर्वी दुरुस्त करण्याची मागणी चिंचोली येथील बाळासाहेब जाधव यांनी आमदार सुनील शेळके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.