जुन्नर बाजार समितीत प्रशिक्षण वर्ग
जुन्नर (वार्ताहर) – केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा अधिक फायदा होणार असून व्यवहारातील पारदर्शकता वाढणार असल्याचे बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे यांनी याप्रसंगी सांगितले.
केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) योजनेबाबत संबंधितांना माहिती मिळण्याकामी रविवारी (दि. 1) जुन्नरला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रणालीअंतर्गत जुन्नरच्या बाजार समितीचा समावेश झाला असून याबाबतचे मार्गदर्शन केंद्र शासन नियुक्त रंगनाथ कटरे यांनी केले. याप्रसंगी शेतकरी, व्यापारी, आडते, हमाल, मापाडी, व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी कटरे यांनी शेतमालास योग्य भाव मिळणे, शेतमालाचे वर्गीकरण(ग्रेडिंग), योग्य हाताळणी, मालाचे योग्य वजन व विक्री झालेल्या मालाचे तात्काळ पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा होणे आदींबाबत सखोल माहिती देण्यात आली. त्यानंतर कवडे बोलत होते. या वर्गाला उपसचिव शरद घोंगडे, दीपक मस्करे, आडतदार विजय कबाडी, मंगेश विधाटे, स्वप्नील काळे आदी उपस्थित होते.
या योजनेंतर्गत राज्यातील इतर बाजार समितीमध्ये नोंद असणाऱ्या खरेदीदार व्यापाऱ्यांना बोली लावणे शक्य होणार आहे. त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.
– धनेश संचेती, संचालक, बाजार समिती, जुन्नर
भविष्यात गावांतील शेतमालास राष्ट्रीय स्तरावर देखील बाजार पेठ उपलब्ध होणार असून यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असून शेतकऱ्यांना देय असणाऱ्या रकमाबाबत अधिक सुरक्षितता निर्माण होणार आहे. या योजनेतील लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारसमितीकडे नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड, बॅंकपास बुक, मोबाइल नंबर अनिवार्य आहे.
– प्रकाश ताजणे, संचालक,बाजार समिती, जुन्नर