पुणे (अविनाश ढगे) –वाढत्या तापमानाबरोबरच राखीव आणि खासगी वन क्षेत्रातील वणव्यांचे प्रमाण वाढले असून, गेल्या तीन महिन्यांत पुणे जिल्ह्यात 42 वणव्यांची नोंद झाली आहे. यामुळे वनसंपत्तीचे नुकसान होण्यासह 65 हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. याबाबत वन विभागाने माहिती दिली आहे.
साधारणत: जानेवारीनंतर वणव्यांची झळ सुरू होते. तर, मार्च-एप्रिलमध्ये सर्वाधिक घटना घडतात. गेल्या वर्षभरात 135 ठिकाणी वनवे लागले असुन यात 397.69 हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. यात प्रामुख्याने बारामती, पौड, इंदापूर, वडगाव मावळ, भांबुर्डा या भागातील वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात होरपळले आहे. हे वणवे प्रामुख्याने राखीव वनक्षेत्रात लागले आहेत. जिल्हयातील 2029 चौ.कि.मी क्षेत्रफळ वनविभागाच्या अखत्यारीत येते. यातील काही भाग पश्चिम घाटाशी संलग्न असल्यामुळे तेथे प्रसिद्ध वनसंपदा आढळते. पण, आगींमुळे वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय, लहान प्राणी-सरपटणारे जीव आणि मौल्यवान झाडांचा नाहक बळी जात आहे. अनेकदा मानवी चुकांमुळे हे वणवे पेटतात. मात्र, ते रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत.
वनवणवा परिषद झालीच नाही
साधारणपणे फेब्रुवारीपूर्वीच वनवणवा परिषद घेणे आवश्यक आहे. परंतू एप्रिल संपत आला, तरी यंदा ही परिषद झालेली नाही. त्यामुळे वनविभागाची बेफिकरी दिसून येते. दरवर्षी पावसाळ्यात हजारो झाडे लावली जातात. त्यांच्या देखभालीसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. पण, वणवे रोखले जात नाहीत.