संतोष पवार
सातारा – जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत अनुदानावर विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन महिला व युवतींना आधार दिला आहे. जिल्ह्यात वर्षभरात 2 हजार 294 महिला व युवतींना विविध योजनांद्वारे एक कोटी 14 लाख 7 हजार रुपयांचे अनुदान दिले आहे. करोनाच्या संकटात आर्थिक अडचणी असतानाही ही कामगिरी करून या विभागाने आपला नावलौकिक कायम ठेवला आहे.
महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून महिला, युवती, बालके यांच्यासाठी विविध योजना, उपक्रम राबवले जातात. अंगणवाड्यांच्या माध्यमातून गावोगावी, खेडोपाड्यांमध्ये पोषण आहार उपलब्ध करुन दिला आहे. लहान बालकांचे कुपोषण होऊ नये यासाठी हा विभाग प्रयत्नशील असतो.
महिला व बालकल्याण सभापती सौ. सोनाली पोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून गेल्या वर्षभरात विविध योजनांना आणखी गती मिळाली. ग्रामीण भागातीप महिलांना पिठाच्या गिरणीसाठी 25 लाख रुपये तरतूद करून 231 लाभार्थींची निवड केली. त्यांना अनुदान वितरित करण्यात आले.
कोंबडी गट वाटपासाठी 216 महिलांची निवड करुन 10 लाख रुपये, ग्रामीण भागात शिलाई मशीनसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी 111 महिलांना 5 लाख अनुदान, सातवी ते बारावी उत्तीर्ण 821 मुलींना एमएससीआयटी प्रशिक्षणासाठी 29 लाख 58 हजार रुपये अनुदान, ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या 150 मुलींना सायकलसाठी 6 लाख रुपये अनुदान, 673 महिला व मुलींना टायपिंग प्रशिक्षणासाठी 28 लाख 49 हजार अनुदान, 92 महिलांना पिठाची गिरणी योजनेसाठी 10 लाख रुपये असे जिल्ह्यात वर्षभरात दोन हजार 294 महिला व युवतींना विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना एक कोटी 14 लाख 7 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आल्याचे रोहिणी ढवळे यांनी सांगितले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पोषण अभियान जन आंदोलन कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कार्यकृती करणाऱ्या जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेला सन्मानित करण्यात आले. दरवर्षी महिला व बालकल्याण विभागाकडून नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येत असल्याचे ढवळे यांनी सांगितले.