पुणे : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर दोन व्यक्ती एका नव्या नात्याची सुरुवात करत असतात. परंतु अलीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे दोघात वैचारिक कारणामुळे मतभेद निर्माण होतात. घटस्फोटाशिवाय कुठलाही पर्याय उरत नाही. अशाच प्रकरणात मतभेद टोकाला गेल्यामुळे दिड वर्षांपासून विभक्त राहणाऱ्या उच्च शिक्षित दांम्पत्याचा घटस्फोट अर्ज पहिल्याच सुनावणीमध्ये कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. पहाडे यांनी मंजुर केला आहे.
परस्पर संमतीने घटस्फोट घेणेकरिता ६ महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार प्रकरण दाखल करण्यापूर्वी दांम्पत्य १८ महिने विभक्त राहत असल्यास हा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दोघे दीड वर्षे वेगळे राहत होते. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदारांच्या वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे. यामध्ये अर्जदारांतर्फे ॲड. अक्षय विलास ननावरे, ॲड. वैभव हरिहर धनकुडे व ॲड. दिव्याराणी बाळासाहेब कुंजीर यांनी काम पाहिले.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) यांचा विवाह २०२१ मध्ये झाला होता. परंतु, स्वभाव व आवडी निवडी यांच्यामुळे परस्परांमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे दोघेही सप्टेंबर २०२२ पासून विभक्त राहत होते. या कालावधीत दोघांच्याही नातेवाईक, मित्रमंडळींनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते निष्फळ ठरले. सरतेशेवटी दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणातील पत्नी या वकील आहेत. तर पती हे व्यावसायिक. दोघांनीही सर्व गोष्टींची पूर्तता केली असून, एकमेकांविरोधात कुठलीही मागणी अथवा देवाणघेवाण नाही. तर, पत्नीला वकिली करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यातील मुद्दे येथे लागू होत असल्याने सहा महिन्यांचा कालावधी माफ करण्यात यावा, असा युक्तिवाद अर्जदारांचे वकील ॲड. अक्षय विलास ननावरे यांनी केला.
“दांपत्य दिड वर्षांपासून वेगळे राहत आहेत. परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यास तयार आहेत. तसेच, अर्जदार पत्नीच्या वकिली व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होऊन मोठे नुकसान होत असल्यामुळे दोघांनाही आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते. हा कालावधी माफ करून घटस्फोट मंजुर केल्यामुळे दोघांच्याही वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.” – ॲड. अक्षय विलास ननावरे- अर्जदारांचे वकील