Opportunities in Agritourism : कृषी पर्यटन म्हणजे शेतात आणि गावात फेरफटका मारणे, आपल्या संस्कृतीची ओळख करून घेणे, नैसर्गिक आनंद घेणे. शहरी जीवनशैलीचा कंटाळा आलेल्या लोकांनी दोन दिवस शेतकर्यांच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्यांनी शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरातिथ्य करणे म्हणजे कृषी पर्यटन होय. कृषी पर्यटन हा पर्यटनाचा नवीन पदर आहे. ‘कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास’ या ब्रीद वाक्याला साजेसे कृषी पर्यटन क्षेत्र आहे. शेती व्यवसाला जोड व्यवसायाची साथ देऊन उत्पादनांत भर घालता येणारा प्रकल्प म्हणजे ‘कृषी पर्यटन’ होय.
कृषी पर्यटन म्हणजे प्रत्यक्षात शेती कशी केली जाते. शेती कशी पीकवतात. शेतात कोण कोणती पीके कधी येतात. शेतीची लागवड कधी आणि कशी केली जाते. एकंदरीत ग्रामीण भागातील शेती विषयक सर्व उपक्रम आणि कार्य जे शेतात चालतात आणि ते बहुतांश शहरी लोकांना वाचून किंवा ऐकूण माहिती असते. पण प्रत्यक्षात शेतात जाऊन ते पाहणे, अनुभवणे, स्वत: शेतात काम करणे आणि खऱ्या अर्थाने अनुभव घेऊन, ग्रामीण जीवन जगण्याचा पर्याय कृषी पर्यटनाच्या माध्यामातुन ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष स्व: अनुभव घेणे म्हणजे “कृषी पर्यटन होय”.
कृषी पर्यटनातून ग्रामीण भागातील शांत वातावरण, शुध्द हवा, निसर्गरम्य परिसर, कला, संकृती, वेशभुषा, खाद्यसंकृती तसेच गावात आढऴणाऱ्या दुर्मिळ वनस्पती, झाडे, प्राणी, पक्षी, झरे, डोंगर, दऱ्या, निसर्ग निरीक्षण, शिवार शेतीचा अनुभव घेता येतो.
या नव्या आणि महत्वाच्या क्षेत्रात अनेक संधी आणि आव्हाने आहेत. स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण, हक्काचं व्यासपीठ, असंघटित केंद्र, प्रशिक्षणाची गरज, भांडवल, मार्केटिंग आणि जाहिराती, संकल्पनेचा प्रचार आणि प्रसार, कायदेशीर परवानग्या, शास्रशुध्द माहितीचा अभाव, कृषी पर्यटन केंद्रासाठी आचारसंहिता, संशोधनाची गरज, मुलभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, नैसर्गिक आपत्ती, पर्यटकांची असुरक्षितता, स्थानिक समस्या, कृषी पर्यटन केंद्र का रिसोर्ट?, लक्ष गट, मद्यपान, अचानक आलेले पर्यटक यांसारखी अनेक आव्हाने आहेत, मात्र संधी पण कमी नाहीत.
शेतीला उत्तम जोड व्यवसाय, गावाचा आणि शेतीचा विकास, गावच्या आर्थिक स्तरात वाढ, रोजगार संधी, शेती मालाला बाजारपेठ, शेतकऱ्यांना पैसा आणि प्रतिष्ठा, ग्रामीण महिलांचे सबलीकरण, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ, ग्रामीण व शहरी संस्कृतीचा संगम, माहिताचे संक्रमण, उज्ज्वल भविष्य, ग्रामीण लोककला / संस्कृतीचे संरक्षण, शाश्वत शेती आणि पर्यटन, विविधधेत एकता, औषध वनस्पतीचे संवर्धन, शैक्षणिक सहलीचे ठिकाण, सेंद्रिय शेतीचा प्रसार अशी अनेक आव्हाने कृषी पर्यटन क्षेत्रात आहेत. त्यापैकी महत्वाच्या आव्हान आणि संधी विषयी चर्चा करूया…
कृषी पर्यटन शेतीपूरक व्यवसाय –
महारष्ट्रातील काही भागात पंधरा सोळा वर्षांपासून शेतकऱ्यांना कृषी पर्यटन केंद्र संजीवनी ठरत आहे. निसर्गाचा लहरीपणा, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, बदलते ऋतुचक्र, पर्यावरणाचे असमतोल अशा निसर्गाच्या संकटात शेतकरी सापडला आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आदिम काळापासूनच शेती केली जाते. याच शेतीवर अनेक पिढ्या आपला उदरनिर्वाह करीत आल्या आहेत. पूर्वीची शेती करण्याची पद्धत आणि आताच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. या बदलांसह शेतीपूरक व्यवसायातही अनेक बदल झाले आहेत. काळानुसार बदलणे हे विकासाचे तसेच समृद्धी मार्गावर जाण्याचे लक्षण आहे. शेतीपूरक अनेक व्यवसाय आहेत. त्यापैकी एक म्हणेज कृषी पर्यटन. कृषी पर्यटनाचे वाढते महत्त्व लक्षात घेता, भविष्यात कृषी पर्यटन हा सर्वोत्तम जोडधंदा नक्कीच ठरेल. महाराष्ट्रात कृषी पर्यटन या व्यावसायिक चळवळीचा मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार होत आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटनाचा विस्तार होत आहे; याचे महत्त्वाचे कारण म्हणजे झपाट्याने होत असलेले शहरीकरण. या शहरीकरणाचा फायदा शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हवामानात होणारे बदल, दुष्काळ (ओला, कोरडा), रासायनिक खतांचा भरमसाठ वापर, उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळत नाही. शेती क्षेत्रातील संशोधन अत्यंत अल्प प्रमाणात होत असून, निसर्गाचा लहरीपणा, तुकड्या-तुकड्यांची शेती, निसर्गाची अवकृपा या सर्व कारणासांठी शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्याचे आपण पाहतो, ऐकतो, वाचतो. एवढेच नाही तर समाजमाध्यामतून चर्चासुद्धा करतो. याचाच परिणाम म्हणजे शेतात उत्पादन खूपच कमी होते.
उत्पादन कमी म्हणजे शेतकरी तोट्यात जाणार. याचा फटका कुटुंबाला आणि अप्रत्यक्ष गावाच्या आर्थिक उलढालीत जाणवतो. शेतकरी नेहमीच आर्थिक अडचणीत जगत असतो. या सगळ्यातून बाहेर पडायचे किंवा मार्ग काढायचा असेल तर काही तरी शेती पूरक व्यवसाय करणे जिकीरीचे ठरत आहे.
मराठवाडा आणि विदर्भात तर शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या होतात. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून या आत्महत्या आपण रोखू शकतो. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आज असंख्य शेतकरी आपल्या पायवर उभे राहत आहेत. शेतकरी ताठ मानेने गावात कृषी व्यवसाय करत आहेत. या व्यवसायातून कुटुंबाचा आणि पर्यायाने गावाचाही विकास होताना दिसत आहे. यातून रोजगाराची संधी निर्माण होत आहेत. गावातून होणारे स्थलांतर थोड्याफार प्रमाणात तरी कमी झाले आहे. महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी दूरदृष्टीचा विचार करून कृषी पर्यटन केंद्र सुरु केले आहेत.
राज्यातील अनेक कृषी पर्यटन केंद्र शहरी पर्यटकांची नाळ ग्रामीण भागाशी जोडण्याचे काम करत आहेत. फळ झाडे, भाजीपाला नर्सरी, कलाकृती, वस्तू प्रदर्शन यातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल. कृषी पर्यटन केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे आणखी एक स्रोत मिळून त्यांच्या आर्थिक विकासाला हातभार लागू शकतो. शेतकरी कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून शेतकरी शेतीचा विकास नक्कीच करू शकतो, असा आत्मविश्वास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. ही एक आनंदाची बाब म्हणता येईल !!!
गावाचा विकास –
कृषी पर्यटन ही ग्रामीण विकास मधील संधी नव्हे तर सुवर्णसंधी आहे. पर्यटक कृषी पर्यटन केंद्रात राहण्यासाठी येतात. गावात, शेतात फिरतात. ग्रामीण भागात काही दुर्मिळ औषध वनस्पती, विविध रोपांचे निर्मिती केले जाते. या दुर्मिळ घटकांची माहिती पर्यटकांना नसते. गावात एखादी मोठी नर्सरी असेल, फळबाग असेल, प्रसिद्ध ठिकाण, गूळ निर्मित केंद्र, अशा ठिकाणी फिरतात आणि वस्तू खरेदी करू शकतात. यामुळे ग्रामीण भागाचा व्यवसाय वाढतो. यातून गावाचा विकास होण्यास मदत होते. ग्रामीण भागातील वस्तू शहरात जाऊन विक्री करण्यापेक्षा तीच वस्तू जर कृषी पर्यटन केंद्रावर मिळत असेल शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल. यातून गावच्या विकासाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होते.
गावातील काही महिला बचत गट असेल तर त्यांचे पापड, लोणचं (आंबा, आवळा,लिबु ) शेवई इ. ग्राहक थेट खरेदी करू शकतात. तसेच परीसरातील ऐतिहासिक, धर्मिक, धरण, धबधबा, या ठिकाणी अनेक छोटे मोठे दुकान, टपरी लावून स्थानिक लोक व्यवसाय करतात. यातून गावाचा नक्कीच विकास होते. गावातील कालकृती उदा: बांबूचे टोपले, सूप बनवणे तसेच नीरा काढणे, मध काढणे तसेच इतर ग्रामीण भागातील पदार्थ वस्तू विक्रीतून विकास होऊ शकते. भाजीपाला लागवड, पशुपक्षी व्यवस्थापन, स्वयंचलित खत देणारी प्रणाली, चारा पिके, पॉलीहाऊस, फळप्रक्रिया, बीजप्रक्रिया, कृषी पर्यटन, शेततळी, पाणी देण्याची विविध पद्धती येथे एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे.
स्वयंरोजगार, रोजगार निर्मिती –
कृषी पर्यटनातून ग्रामविकास आणि ग्रामविकासातून महाराष्ट्राचा विकास या संकल्पनेतून कृषी पर्यटनाचा विकास करता येईल. ग्रामीण भागातील तरुणांची संख्या शहाराकडे येत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे बेरोजगारी होय. ग्रामीण भागात कोणतेच व्यवसाय, उद्योग मोठे नाहीत. काही छोटे मोठे व्यवसाय आहेत पण कामगारांना पगार कमी आहे. इतर सोई-सुविधा नाही. या महागाईच्या काळात पाच-सहा हजार पगार परवडत नाही. यामुळे तरुणांचा ओढा शहराकडे मोठ्या प्रमाणत वाढत आहे. हे स्थलांतर थांबवायचे असेल तर कृषी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्यास वाव आहे. गावाचा इतिहास, गावाबद्दल माहिती असलेल्या तरुणांनी पर्यटकांना माहिती सांगण्याचे काम तरुणांच्या माध्यामतून होऊ शकते. गावाचा इतिहास, संस्कृती, विविध वनसंपती यांविषयी माहिती हे तरुण पर्यटकांना देऊ शकतात. यातून गावाची संस्कृती जपली जाते आणि प्रत्येक पर्यटन केंद्रांना कमीत कमी पाच, जास्तीत जास्त शंभर लोकांनाही रोजगार मिळू शकतो.
कृषी पर्यटन केंद्र उभारणीसाठी मनुष्यबळ लागते. पर्यटकांचे नियोजन, मार्गदर्शन, स्वयंपाकासाठी, शेतीकामासाठी, माळी काम, लॉड्री, ट्रेकिंग, बोटिंग, शिवार फेरी, बाजार खरेदी, ऑनलाईन मार्केटिग, जाहिराती, व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणत कामगार लागतात. काही केंद्रांवर हंगामी कामगार काम करतात. बैलगाडी, टॅक्टर, उंट, विहरीत पोहणे, यासाठी प्रशिक्षकांची गरज भासते. यामुळे ग्रामीण भागातच रोजगार मिळू शकेल. ग्रामीण भागात महिला पुरणपोळी, भाकरी, विविध प्रकारच्या चटणी बनवतात. या कौशल्याचा उपयोग करून त्या मोठ्या प्रमाणत कृषी केंद्रासाठी रोजगार निर्माण करू शकतात. तसेच ग्रामीण भागातील पापड, लोणचं, स्थानिक खाद्य पदार्थ तयार करून कृषी पर्यटन केंद्रावर विक्रीसाठी ठेवता येते. स्थनिक कलाकार, हस्तकला, कलाकृती, दुर्मिळ वास्तू इ. दाखवण्यासाठीही मनुष्यबळाची गरज भासते.
आलेल्या पर्यटकांना मनोरंजन करण्सायाठी लोकगीते, लोककला सादर करण्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते. उदा : पोवाडा, भजन, कीर्तन, भारूड, नृत्य, इत्यादींच्या माध्यमातून रोजगार निर्मितीची संधी या कृषी पर्यटनातून मिळू शकते. या व्यतिरिक्त प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख व वैशिष्ट्य असते. नदी, ओढे, विहारी तलाव, धरण, शेततळे इत्यादी ठिकाणी रोजगार निर्मिती होते. सुतार, कुंभार, लोहार, यांच्या वस्तू पर्यटक खरेदी करतात. जत्रा यात्रा, उरूस, महोत्सव (आंबा, अंगूर) इ महोत्सवात पर्यटक सहभाग नोंदवतात आणि यातून गावातील प्रत्येक कलेचे संवर्धन होते. गावातील लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊ शकते.
संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन –
ग्रामीण संस्कृती, परंपरा, कलाकृती लोप पावत चालल्या आहेत. पूर्वी गावागावातील महिलांचा गट प्रत्येक घरा घरात जाऊन गाणी गायचे. जुने गाणी, कथा, संस्कृती, परंपरा नष्ट होत आहेत. हे सर्व कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जतन करता येईल. गावातील ग्रामीण संस्कृती संपत आहे. ग्रामीण भागात पूर्वी लुगडे, धोतर पगडी परिधान करत असत. गावातील संस्कृतीवर शहरांचा पगडा वाढत आहे. गावातील घरे, रस्ते, गल्लीबोळ यात मोठ्या प्रमाणत बदल होत आहेत. पूर्वीची कौलारू घरे, घर शेणाने सारवणे, घराची रचना, अंगण तसेच वेशभूषा, केशभूषा, पारंपरिक पेहराव, राहणीमान, बोलीभाषा, चित्रकला इ. चे जतन आणि संवर्धन पर्यटन केंद्राच्या माध्यमातून होत आहे. शहरी भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात येतात. त्यांना ग्रामीण संस्कृतचे विशेष आकर्षण असते. कृषी पर्यटनातून लोक ग्रामीण जीवन पाहतात, अनुभवतात आणि जगतात. यातूनच आपल्या ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन होते.
आदिवासी भागात त्यांची बोली भाषा, कला परंपरा लोप पावत आहे. आदिवासी लोक ओळखत असलेली वनसंपत्ती व त्या वनसंपत्तीची गरज, उपयोग, महत्व कशासाठी होते. कोणते पीक केव्हा येते, त्याच्या उपयोग कधी करावा, याची माहिती फक्त या आदिवासी लोकांना आहे. या माहितीचे संक्रमण आणि संवर्धन होण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र आहे. यातून ग्रामीण भागात असलेल्या सर्वच घटकांचे संरक्षण होते आणि पर्यटकांना वेगवेगळी माहिती मिळते. पर्यटक आनंदित होतात. यामुळे प्रत्येक कृषी पर्यटन केंद्राचे नावही पर्यटक घेतात. तसेच त्या त्या गावाचे संस्कृतीचे जतन होते.
– गणेश चप्पलवार
(कृषी पर्यटन अभ्यासक, मो. 8888559886)