पिंपळे गुरव (वार्ताहर) – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याशिवाय झोपडपट्टी परिसरात करोना संसर्गाचा वेग वाढत आहे. पिंपळे गुरवमधील राजीव गांधी वसाहत मात्र याला अपवाद ठरली आहे. येथील नागरिकांनी दाखवलेली स्वयंशिस्त आणि जागरूकता याला कारणीभूत ठरली आहे. शिस्त राखल्यास दाटीवाटीच्या भागातही करोनाला रोखता येऊ शकते, हे स्थानिक रहिवाशांनी दाखवून दिले आहे.
शहरातही अनेक भागात इतरत्र झोपडपट्ट्या आहेत. अत्यंत दाटीवाटीने लोक तेथे वास्तव्यास आहेत. अशा अनेक ठिकाणी करोनाचा शिरकाव होऊन तो वाढताना दिसून येत आहे. मात्र नागरिकांच्या स्वयंशिस्तीमुळे राजीव गांधी वसाहत याला अपवाद ठरली. या परिसरात दाटीवाटीत राहणारे सुमारे सहा ते सात हजारांपर्यंत लोकसंख्या असताना या वसाहतीमध्ये अजूनपर्यंत करोनाचा शिरकाव झालेला नाही.
करोनासारख्या विषाणूचा आपल्या वस्तीत प्रवेश होऊ नये यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, स्थानिक नगरसेवक व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते लढा देत आहेत. माफक शुल्कात घरपोच भाजीपाला देण्याची सुविधा दिली जात आहे. अत्यावश्यक सेवा सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटपही करण्यात आले आहे. अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांसह योग्य ती खबरदारी घेऊन गर्दीतील राजीव गांधी वसाहत सुरक्षित ठेवण्यात रहिवाशांचा मोलाचा वाटा ठरला आहे.
करोनाच्या काळात मनसेचे उपविभाग अध्यक्ष अनिल भुजबळ, झोपडपट्टी सुरक्षा दल सचिव विलास थोरात, आरपीआयचे अध्यक्ष राघू साबळे, सामाजिक कार्यकर्ते बबन काळे, संजय गायकवाड, ऍड. गोविंद वाल्हेकर, अमोल खंडागळे, प्रकाश हादवे, कल्पेश कदम, दीपक कदम, संदीप थोरात, अश्विन खुडे, सूर्यकांत हादवे अशा आदी नागरिकांच्या सहकार्यामुळे राजीव गांधी वसाहत सुरक्षित ठेवता आली.
वसाहतीतील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दिवसातून दोन वेळा निर्जंतुकीकरण केले जात आहे. रस्त्याची सफाई करून कचरा उचलला जात आहे. आरोग्य विभागाच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी सुनियोजित काम केले, यामुळे या परिसरात करोनासारख्या विषाणूला थोपवता आले. स्थानिक नागरिकांनीही योग्य सहकार्य केल्याचे हे फलित मानले जाते.
– उद्धव डवरी, आरोग्य निरीक्षक
नागरिकांमध्ये करोनाविषयी वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने संपूर्ण प्रभागात वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. प्रभागातील स्वच्छतेकडे लक्ष दिले जात आहे. येथील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले आहे.
-अंबरनाथ कांबळे,नगरसेवक, अध्यक्ष “ह’ क्षेत्रीय कार्यालय
राजीव गांधी वसाहतीमध्ये करोनाबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. तसेच नागरिकही सूचनांचे पालन करीत आहेत. परिसरातील दुकाने प्रशासनाने दिलेल्या वेळेत बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे वसाहतीमध्ये करोनाचा शिरकाव तत्काळ थांबला.
– अनिल भुजबळ, अध्यक्ष, मनसेचे उपविभाग
रहिवासी अशी घेताहेत काळजी
सहा ते सात हजार लोकसंख्या असलेल्या वसाहतीमध्ये हातावर पोट असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. लॉकडाऊनच्या काळात येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने वसाहतीमध्ये वारंवार निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. तसेच महापालिकेच्या वतीने येथील नागरिकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली. येथील नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार, व्हिटॅमिन, रोगप्रतिकारक शक्तीच्या गोळ्या देण्यात येत आहेत. त्यामुळे करोनाचा प्रसार रोखण्यात मदत होत असल्याचेही सांगण्यात येत आहे.