पेठ -येथील परिसरात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण व वादळ-वारे येत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरण कंपनीने रस्ते व नागरी वस्तीजवळ असलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम करोना साथीची काळजी घेत सुरू केले आहे.
वादळी वारे, अवकाळी पाऊस यामुळे जीविताला आणि मालमत्तेस धोकादायक असलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. विजेच्या तारांना अडथळा होत असेल तर झाडांच्या फांद्या कापण्याची परवानगी महावितरण किंवा महापारेषणला आहे. त्यांना परवानगीची गरज नाही. झाडांच्या फांद्यांमुळे शॉर्टसर्किट किंवा वीज ट्रीप होण्याची भीती असते, तसेच वाहतुकीला व जीविताला काही वेळेस धोका पोहोचू शकतो. म्हणून पेठ येथील महावितरण कर्मचाऱ्यांनी झाडाच्या फांद्यांच्या छाटणीस सुरुवात केली आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून राज्य लॉकडाऊन केले असताना या काळातही महावितरणची पेठ शाखातील यंत्रणा अत्यावश्यक असलेली वीज सेवा अखंडित देण्यासाठी सज्ज आहे. आरोग्याची योग्य खबरदारी घेऊन अभियंता व कर्मचारी सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य देत कर्तव्य बजावत आहेत.
प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी व तांत्रिक कर्मचाऱ्यांना करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत, तसेच कार्यालय प्रमुखांना मास्क, लिक्विड हॅण्डवॉश, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासोबतच दुरुस्तीच्या कामासाठी जाताना कर्मचारी व जनमित्रांनी स्वतःचे ओळखपत्र सोबत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो तत्परतेने पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
मात्र, काही गंभीर तांत्रिक बिघाडामुळे वेळ लागल्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरण घोडेगावचे वरिष्ठ अभियंता एन. एन. घाटुळे तसेच पेठ शाखेचे कनिष्ठ अभियंता किशोर खलाने यांच्याकडून करण्यात येत आहे. अवकाळी पाऊस वारे वादळ यामुळे नुकसान होऊ नये म्हणून झाडे छाटणीसाठी उस्मान शेख, राहुल सुक्रे, अमोल ढगे, विकास गायकवाड, सचिन सांडभोर, संदीप गुंजाळ, के. के. ढोरे आदी कर्मचारी काम करीत आहे.