केंदूर – करोना रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत लॉकडाऊन केला असल्याने ऐन पाडव्याला विक्रीसाठी राखून ठेवलेली फुले शेतातच सडून जायला सुरुवात झाली आहे.
पाडव्याच्या सणाला बाजारात झेंडू, गुलाब, अष्टर अशा अनेक प्रकारच्या फुलांची मागणी असते. ती मागणी ओळखून अनेक फूल उत्पादक शेतकऱ्यांनी फुलांचे मळे थाटले होते; मात्र, करोना रोगाच्या जागतिक संकटामुळे या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. या पाडव्याच्या सणाला सर्वात जास्त झेंडूच्या फुलांची जास्त मागणी असते.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांचे उत्पन्न घेतले होते. यासाठी दोन एकर क्षेत्रावर झेंडूचे उत्पन्न घेण्यासाठी तब्बल दीड लाखाहून अधिक खर्च येतो त्यामध्ये सरासरी या पिकाची एकूण आठवेळा तोडणी होणे अपेक्षित असते. एका वेळी किमान दोन टन फुलांचे उत्पादन होणे आवश्यक असते.
त्यामुळे बाजारभावात चढउतार होऊनदेखील या तीन ते चार महिन्यांच्या पिकाचे पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन असल्याने फुलांना बाजारपेठ मिळाली नसल्याने शेतकऱ्यांचे या पाडव्याला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन आधुनिक तंत्रज्ञान वापरून ठिबक सिंचन, शेणखत, औषध फवारणी, मल्चिंग पेपर, तारा, बांबू, मशागत, लाईटबिल यासारख्या अनेक भांडवली खर्चाला सामोरे जाऊन देखील फुल उत्पादक शेतकऱ्यांचा शेतीमधील शेतातच राहिला असल्याने शेतकरी उघड्या डोळ्यांनी पाहून हतबल झाले आहेत, असे चित्र किती दिवस चालणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
फुलाच्या शेतीची मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागते. लाखो रुपये खर्च करूनदेखील कमी-अधिक किमतीत फुले विकली जातात; मात्र यावेळी करोना रोगामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने मोठं संकट उभे राहिले आहे.
– प्रकाश दरेकर,
फूल उत्पादक शेतकरी