उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात होऊ लागली वाढ : अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा
कळस – गेल्या काही दिवसांपासून पुणे, पिंपरी – चिंचवड आणि लोणावळा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खडकवासला, टेमघर, पानशेत, वरसगाव आणि पवना धरणक्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. या पावसामुळे भीमा पात्रात पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे. या पावसाचा फायदा उजनी धरणाला होत आहे.
गेल्यावर्षी उजनी धरण परिसरात व सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस होऊन सुद्धा पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनीवरील सर्व धरणे भरून उजनीत खडकवासला, पानशेत, टेमघर,भामा आसखेड, पवना या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उजनी धरण 110 टक्के भरले होते. धरण व नदीपात्रालगतच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील महिनाभर पाण्यासाठी तहानलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.
नदीपात्रालगतच्या शेतकऱ्यांनी धरणात पाणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन पिकांचे नियोजनही सुरू केले आहे. या तीनही तालुक्यांतील जिरायत आणि कालवा सिंचनखालील क्षेत्रातील शेतकऱ्यांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. या जिरायती क्षेत्रात खरीपात बाजरी व मका ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. मशागत करून शेती पेरणीसाठी सज्ज आहे. शेतात पिके नसल्याने आणि पाऊसही लांबल्याने शेतीतील कामे थंड आहेत. पाऊस न आल्यास पेरणीचा खर्च वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी पेरता होण्यास तयार नाही, असे मत प्रगतशील शेतकरी अजय राजेभोसले यांनी व्यक्त केले.
दृष्टिपथातील उजनी धरणातील पाणीसाठा
उजनी जलाशयात एकूण पाणीपातळी 475.090 मीटर तर एकूण पाणीसाठा 908.60 दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठा वजा 894.21 दलघमी तर टक्केवारी वजा 58.94 टक्के, एकूण टीएमसी 32.08 तर उपयुक्त टीएमसी वजा 31.58 आहे. गेल्यावर्षी आजच्यादिवशी उजनी धरणाची टक्केवारी वजा 19.77 इतकी होती.