तहसीलदारांकडे कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
रेडा – इंदापूर तालुक्यात अद्याप पाऊस नसल्याने तालुक्यातील शेतीसाठी नीरा डावा कालवा व खडकवासला कालव्यातून तातडीने पाणी द्यावे, अशी मागणी इंदापूर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि.12) इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. तालुक्यातील सर्व तलावांमध्ये पाणी सोडण्यात यावे, पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत, आदी मागण्याही शासनाकडे केल्या आहेत.
इंदापूर तालुक्याच्या हक्काचे पाणी गेल्या साडेचार वर्षांत इंदापूर तालुक्याला मिळाले नाही. सध्या तालुक्यात पिण्याचे पाणी तसेच जनावरांना चाराटंचाई जाणवत आहे. शेतातील पिके जळून गेल्याने तालुक्यात शेतीसाठी पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
खडकवासला धरण व नीरा खोऱ्यातील भाटघर आणि इतर धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाल्याने इंदापूर तालुक्यामध्ये पिण्यासाठी पाणी व चारा पिके आणि शेतातील उभ्या पिकांसाठी तातडीने आवर्तन देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. खडकवासला कालव्यातून लाभक्षेत्रातील तरंगवाडी, पोंदकुलवाडी, बिजवडी, कौंठळी, न्हावी, रूई, पळसदेव, काळेवाडी, डाळज, कळस,भादलवाडी, पोंधवडी, मदनवाडी, अकोले, निरगुडे, शेटफळ गढे, म्हसोबावाडी येथील पाझर तलाव भरून घेण्यात यावेत. तर नीरा डावा कालव्यातून शेटफळ हवेली, अंथुर्णे, वरकुटे खुर्द, वडापुरी, वाघाळा तलावांमध्ये तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी केली आहे.
यावेळी कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. कृष्णाजी यादव, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, मंगेश पाटील, बापू जामदार, धनंजय पाटील, महेंद्र रेडके, हनुमंत बनसोडे, निवृत्ती गायकवाड, कैलास कदम, तुळशीराम चोरमले, सुभाष काळे, मच्छिंद्र अभंग, मेघ:शाम पाटील, रघुनाथ राऊत, पिंटू काळे, गोरख शिंदे, वैभव गोळे, प्रवीण देवकर, बाळासाहेब शिंदे, कार्यकर्ते उपस्थित होते.