अमरावती – नाशिकमधील ड्रग्जचे लोण (Drug trafficking) अमरावतीसारख्या शहरातही पसरत आहे. शाळा, कॉलेजमधील मुलांना ड्रग्जच्या विळख्यात ओढले जात आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. नाशिक ड्रग्ज प्रकरणाची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे. तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा हा प्रकार थांबवणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करू नका, असे आवाहन करत राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाशिवाय ड्रग्ज तस्करी अशक्य आहे, असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Ptole) यांनी केला आहे.
अमरावतीमध्ये प्रदेश कॉंग्रेसची आढावा बैठक (Amaravati congress) पार पडली. यावेळी ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले, ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससून रुग्णालयातून (Lalit Patil sasun hospital) फरार करण्यात कोणी मदत केली हे समोर येत आहे. ललित पाटील गायब कसा झाला ? त्याला सोडवण्याचा कोण प्रयत्न करत आहे, याची सर्व माहिती आमच्याकडे आहे, योग्य वेळी ती आम्ही जाहीर करू; परंतु तरुणांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना कोणीही पाठीशी घालू नये. असले प्रकार होऊ नयेत ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. नाशिकमधील ड्रग्ज प्रकरण काही कालचे नाही ते आधीपासूनचे आहे, त्याला कोणाकोणाचा पाठिंबा आहे हे हळूहळू बाहेर येत आहे.
कॉंग्रेस पक्षावर (Congress) जनतेचा विश्वास वाढत असून जनतेपर्यंत जाऊन कॉंग्रेसचा विचार पोहोचवणे याला प्राधान्य दिले जाणार आहे. दरम्यान, जागावाटपाच्या प्रश्नांवर महाविकास आघाडीमध्ये (MVA) चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या पक्षाने जागा लढवावी, अशी मागणी करत असतात ते योग्यच आहे पण मेरीटनुसार जागावाटपाचा निर्णय घेतला जाणार आहे. लोकशाही व्यवस्था मान्य नसलेल्या भाजपाला सत्तेबाहेर काढणे हेच आमचे काम आहे.
व्हायब्रंट गुजरातबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक आहेत, शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरतेला लुटले होते. पण आजचे सत्ताधारी महाराष्ट्र लुटून सुरतेला देत आहेत. सरकारमधले लोक गुजरातचे हस्तक आहेत हे त्यांनीच जाहीरपणे सांगितलेले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.