Smriti Irani On Rahul Gandhi – अमेठीतील निवडणूक रिंगणात गांधींची अनुपस्थिती म्हणजे काँग्रेसने मतदानापूर्वीच पराभव स्वीकारल्याचे लक्षण आहे असे या मतदार संघातील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. अमेठीतून कॉंग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना दिलेल्या उमेवारीवर प्रतिक्रीया देताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, जर त्यांना या जागेवर विजयाची काही शक्यता आहे असे वाटले असते, तर त्यांनी येथून निवडणूक लढवली असती आणि त्यांचे दुय्यम उमेदवार उभे केले नसते.
२० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत मी या मतदारसंघातून पुन्हा विजयी होणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. इराणी यांनी शुक्रवारी रायबरेलीमधून उमेदवारी दाखल करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली.
त्या म्हणाल्या की, ज्याला अमेठीने स्वीकारले नाही आणि जे वायनाडला पळून गेले ते कधीही पूर्णपणे रायबरेलीचे राहणार नाहीत. एका प्रश्नाला उत्तर देताना इराणी म्हणाल्या की, आता अमेठीतील लोकांनी नरेंद्र मोदी सरकारच्या काळात विकास पाहिला आहे, तर गेल्या 50 वर्षांत तो का झाला नाही, असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे.