पुणे – पानशेत, वरसगाव, टेमघर तसेच खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत बऱ्यापैकी पाऊस होत आहे. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसानेही धरणात पाणी येत आहेत. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा शनिवारी सायंकाळी 7.26 टीएमसीवर पोहचला. हे पाणी शहराला पुढील पाच ते सहा महिने पुरेल एवढे आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत रात्री पाऊस होत असून, दिवसा भुरभूर सुरू आहे. गेल्या 24 तासांत तब्बल पाऊण टीएमसी पाणी वाढले आहे. यंदाच्या हंगामात एकाच दिवसात पहिल्यांदाच इतके पाणी वाढले आहे. जूनच्या अखेरच्या आठवड्यात पाऊस सुरू झाला तेव्हा, या चारही धरणांत 4.17 टीएमसी पाणी होते. हा साठा हळूहळू वाढत 7.26 टीएमसीवर गेला असल्याने महापालिकेस काहीसा दिलासा मिळाला आहे.
खडकवासला 50 टक्के भरले
खडकवासला धरण शनिवारी 50 टक्के भरले. तर, पानशेत आणि वरसगाव धरणांतही पाणीसाठा वाढत असून, ही दोन्ही धरणे 24 टक्के भरली आहेत. शनिवारी सायंकाळी 5 वाजता खडकवासला धरणात 1.00, पानशेत-2.64, वरसगाव-3.19 तर टेमघर धरणात 0.44 टीएमसी पाणीसाठा झाला. या धरणसाखळीत खडकवासला सर्वाधिक लहान धरण असून त्याची क्षमता 1.92 टीएमसी आहे. हे धरण सर्वात आधी भरते. त्यामुळे या धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येते.