दक्षिण 24 परगणामध्ये ‘तृणमूल’ने फेकले बॉम्ब
कोलकाता – पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी केंद्रीय दलाच्या तैनातीनंतरही वेगवेगळ्या भागातून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. या हिंसाचारात गेल्या 24 तासांत पाच जिल्ह्यांत 12 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मृतांमध्ये पाच टीएमसी कार्यकर्ते, एक कॉंग्रेस कार्यकर्ता, एक सीपीआय(एम) कार्यकर्ता, भाजप उमेदवाराचा पोलिंग एजंट आणि एका अपक्ष उमेदवाराचा पोलिंग एजंट यांचा समावेश आहे.9 जूनपासून झालेल्या हिंसक घटनांमध्ये मृतांची संख्या 27 वर गेली
आहे. मतदानाच्या दिवशी बूथ लुटणे, मतपत्रिका फाडणे, मतपत्रिका जाळणे अशा घटना अनेक भागांतून पाहायला मिळाल्या.
कूचबिहारच्या मठभंगा-1 ब्लॉकच्या हजरत गावात एक तरुण मतपेटी घेऊन पळून गेल्याचीही घटना घडली. भारतीय सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) आणि तृणमूलच्या(टीएमसी) कार्यकर्त्यांमध्ये दक्षिण 24 परगणामधील भागड ब्लॉकमधील जमीरगाची येथे संघर्ष झाला. त्यावेळी गावातील लोकांच्या आपबीतीनुसार, टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी पिशवीत बॉम्ब भरून आणले होते.
टीएमसीचे कार्यकर्ते गावातील लोकांना धमकावून मते मिळवत होते. त्यांनी इतके बॉम्ब फेकले की दोन तास मतदान थांबविण्यात आले. काही बॉम्ब पत्रकारांच्याही दिशेनेही फेकले गेल्याचेही सांगण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील 73,887 ग्रामपंचायतीपैकी 64,874 जागांवर शनिवारी मतदान पार पडले.
9,013 उमेदवार बिनविरोध
राज्यात एकूण 73,887 ग्रामपंचायतींच्या जागा आहेत, त्यापैकी 9,013 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेले सर्वाधिक 8,874 उमेदवार तृणमूल कॉंग्रेसचे आहेत. तर भाजपचे 63, कॉंग्रेसचे 40 आणि सीपीएमचे 36 उमेदवार बिनविरोध निवडून आले. 2018 च्या पंचायत निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर 58,692 जागांपैकी 20,078 म्हणजेच 34.2% जागा बिनविरोध झाल्या होत्या. यातील जवळपास सर्वच जागा टीएमसीने जिंकल्या होत्या.
पंचायत निवडणुका रद्द करा – कॉंग्रेसची मागणी
कोलकाता हायकोर्टात घेतली धाव
कोलकाता – पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीसाठी आज मतदान घेण्यात आले, पण ही प्रक्रिया हिंसाचार करून ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसकडून झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी भीषण हिंसाचार झाला असून किमान पंधरा जण या हिंसाचारात ठार झाल्याची आमची माहिती आहे, असे कॉंग्रेसने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी या निवडणुकाच रद्द करण्याची मागणी करीत हायकोर्टात धाव घेतली आहे.
राज्यातील कॉंग्रेसचे नेते कौस्तव बागची यांनी या संबंधात एक याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी हायकोर्टाने नवीन घटनात्मक खंडपीठ त्वरित स्थापन करावे आणि निवडणुका रद्द करण्याच्या मागणीवर तातडीने विचार करावा, अशी याचिका त्यांनी कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या हिंसाचाराची कोलकाता हायकोर्टाने स्वत:हून दखल घेतली पाहिजे.
हायकोर्टानेच या निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडाव्यात अशी सूचना केली आहे. पण निवडणूक प्रक्रिया तशा पद्धतीने पार पडली नाही, याची हायकोर्टाने गंभीर दखल घेतली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजपचे प्रमुख नेते सुवेंदु अधिकारी यांनीही या हिंसाचाराचा निषेध केला आहे.