कोल्हेंनी लक्ष घातल्यास गतवैभव?
डॉ. अमोल कोल्हे यांची सर्वसामान्य नागरिक, महिलांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी “क्रेझ’ आहे. शहरातील राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी अमोल कोल्हे यांनी शहर संघटनेत लक्ष घालण्याची गरजही अनेकांनी यावेळी बोलून दाखविली. येत्या विधानसभा निवडणुकीतही त्याचा पक्षाला फायदा होईल, असा विश्वासही अनेकांनी यावेळी बोलून दाखविला.
पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून आलेली मरगळ आणि राज्यपातळीवर सुरू असलेल्या “आऊटगोईंग’मुळे अस्वस्थ असलेल्या शहर राष्ट्रवादीमध्ये आज मोठा जोश दिसून आला. डॉ. अमोल कोल्हे यांनी शहरात लक्ष घालण्यास सुरुवात केल्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून पक्ष कार्यकर्त्यांत नवचैतन्य पहावयास मिळाले.
लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील पक्षसंघटनेतील लक्ष काढून घेतले होते. तब्बल अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर गत आठवड्यात पवार यांनी सांगवीत पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. हा एकमेव कार्यक्रम वगळता पक्ष पातळीवर शांतता होती. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पार्थ पवार यांनी शहरातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि सध्या राज्यपातळीवर सुरू असलेल्या “आऊटगोईंग’मुळे शहरातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण होते. “दादां’ची नाराजी, पार्थ यांना कमी असलेला अनुभव, नगरसेवकांमध्ये नसलेली एकवाक्यता यामुळे पक्षासमोरील अडचणी वाढण्याचीच शक्यता वर्तविण्यात होती. मात्र गुरुवारी शहरातील विविध प्रश्नांसदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लक्ष घातले.
तर कोल्हे येणार हे कळताच राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी महापालिका गाठली. एरव्ही पक्षाकडे पाठ फिरविणारेही कार्यकर्ते जमा झाल्याने सर्वांमध्येच मोठा उत्साह दिसून आला. शहर पातळीवर काही प्रमाणात का होईना पोरक्या झालेल्या संघटनेला नेता मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.