आयुक्तांवर दबाव वाढला : धरण 92 टक्के भरले
पिंपरी – पवना धरण 92 टक्के भरले असून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून शुक्रवारी (दि. 2) उशिरा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. एकीकडे धरणातून विसर्ग सुरू होत असताना दुसरीकडे धरण शंभर टक्के भरल्याखेरीज पाणी कपात रद्द न करण्याची भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. आयुक्तांच्या या भूमिकेवर सर्वस्तरातून टीका होत असून पाणी कपात रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांचाही आयुक्तांवर दबाव वाढला आहे.
गतवर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे पवना धरण शंभर टक्के भरुनही हिवाळ्यापासूनच पिंपरी-चिंचवडकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागला. यंदा उन्हाळा लवकरच सुरू झाला. तीव्र उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले. परिणामी धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने घट होत होती. त्यामुळे पाटबंधारे खात्याकडून पाणी उपसा कमी करण्याच्या सूचना महापालिकेला प्राप्त झाल्या. त्यानुसार पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणी मिळत आहे. यंदाही पावसाने सुरूवातीला ओढ दिली. जूनच्या अखेरीस हजेरी लावून पुन्हा दडी मारली. त्यामुळे धरणातील पाणी साठा अवघा 40 टक्के एवढाच होता.
तथापि, मागील आठवडाभरात पावसाने जोरदार “कमबॅक’ केले. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. धरण आज (दि. 2) सायंकाळी 92 टक्के भरले. 90 टक्क्यांहून अधिक पाणी साठा झाल्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यानुसार आज रात्री धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाकडून महापालिकेलाही याबाबतच्या सूचना सायंकाळी प्राप्त झाल्या.
दरम्यान, धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असल्याने पाणी कपात रद्द करण्याची मागणी होत आहे. मात्र, गतवर्षीचा अनुभव पाहता धरण शंभर टक्के भरल्याखेरीज पाणी कपात मागे न घेण्याची भूमिका महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतली आहे. परंतु, धरणातून विसर्ग सुरु झाल्याने पाणी कपात रद्द करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. भाजप नगरसेविका प्रियंका बारणे, राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी पाणी कपात मागे घेण्याची मागणी केली.