मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा येत्या 14 जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त कार्यकर्त्यांकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. इतकेच काय तर दादरच्या शिवतिर्थ परिसरात मनसेने बॅनर्स लावत भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे असा उल्लेख केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र त्यानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवसापूर्वी खास आवाहन केले आहे.
राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ, मिठाई किंवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. त्याऐवजी झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून द्यावे, अशी विनंती केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “दरवर्षी 14 जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका.’
‘तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे,’ असे आवाहन राज ठाकरेंनी केले. याशिवाय त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्त्यांना भेटण्याची वेळ देखील दिली आहे. ‘सकाळी 8:30 ते 12 वाजेपर्यंत मी उपस्थित असेन. तेव्हा भेटूया 14 जूनला.’, असे त्यांनी सांगितले आहे.