मुंबई – रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आंदोलक ठाम असून त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकरने घ्यावी.
सर्वेक्षण स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, अशी विनंती विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला केली आहे. सर्वेक्षण त्वरित स्थगित करण्यात यावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
दरम्यान, राजापूर तालुक्यातील बारसू इथल्या माळरानावर सुरु असलेल्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी ग्रामस्थांकडून विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान, या सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी निलेश राणे हे बारसू गावात पोहोचले होते. मात्र, रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांचा ताफा अडवला.
यावेळी राणे समर्थकांकडून त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. मात्र, त्यानंतर निलेश राणे यांनी हात जोडून ग्रामस्थांची माफी मागितली. ”जर आमच्यापैकी कोणी तुम्हाला शिविगाळ केली असेल, तर मी तुमची हात जोडून माफी मागतो”, असे ते म्हणाले.