मुंबई : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत बचाओ रॅली दरम्यान आयोजित सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं आक्रमक भूमिका घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते. यावेळी बोलताना शिवसेना सत्तेसाठी लाचारी पत्करत आहे, अशी टीका फडणवीस यांनी शिवसेनेवर केली होती. फडणवीस यांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी महाविकास आघाडीतील पक्षांची बैठक झाली. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. यावेळी ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांवरून केलेल्या टीकेचाही समाचार घेतला. सोमवारी सभागृहात जो प्रकार पाहिला आहे. त्यातून आम्हाला काही शिकवण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला सावरकरांबद्दल प्रेम आहे आणि ते कायम राहणार आहे. आम्हाला शिकवण्याची गरज नाही. अर्धवट सावरकर घेऊ नका, पूर्णपणे घ्या. भाजपा आणि शिवसेना एकत्र लढले. पण आमच्यात काही ठरले होते. त्याचे पुढे काही झाले नाही.
तसेच फोडाफोडीच राजकारण करण्याचे काम मागील पाच वर्षात काही राज्यात त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला राजकारणाबद्दल शिकवू नये. या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना. आपण सरकार स्थापन केले आणि जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याबाबतचा प्रत्यय अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे आपण जनतेचा भ्रमनिरास होणार नाही याची काळजी घेऊ काम करा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी आमदारांना केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्यासमोर सभागृह आणि बाहेरचा प्रश्न आहे. कारण देशात अस्थिर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे देशाची सत्ता भोगत आहे. त्यांच्याकडून सतत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपापसात ठिणग्या टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकारण पाहत मी मोठा झालो आहे. त्यामुळे त्यांच्याकडून राजकारण शिकण्याची गरज वाटत नाही, असे ठाकरे म्हणाले.