शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांचा इशारा
शिरूर -शिरूर तालुक्यातील गावांमध्ये भरणारे आठवडे बाजार, यात्रा, जत्रा, लग्नसमारंभ व सर्व सामूहिक कार्यक्रम रद्द करून नागरिकांनी कुठेही जमाव करू नये. देशावर आलेले करोनाचे संकट परतावून लावण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. कोठेही जमाव आढळ्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी दिला आहे.
करोनो आजाराच्या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी शिरूर तहसील कार्यालयात विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती मोनिका हरगुडे, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश रोकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, सुरेशकुमार राऊत, सदाशिव शेलार, नायब तहसीलदार शानदेव यादव, एमआयडीचे उपअभियंता विनायक खांदवे, सतीश चोंडेकर, आरोग्य विस्तार अधिकारी प्रकाश आव्हाड आदी उपस्थित होते.
तालुक्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून हॉटेल, दुकाने, मॉल, शाळा महाविद्यालये, परमीट रूम, व्यायामशाळा, ऑनलाइन लॉटरी, उद्याने, सिनेमागृह व गर्दीची ठिकाणे दि. 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात यावेत, असे आवाहन तहसीलदार शेख यांनी केले. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त लोक जमविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. स्वंयसेवी संस्था, कंपन्या, नागरिकांनी पुढाकार घेऊन देशावर आलेले हे संकट एकजुटीने परतावून लावू या, असे आवाहन शेख यांनी केले.
कामगारांना सुट्टी द्यावी
तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्याकडून तालुक्यामधील दवाखाने त्यामधील सुविधा व कर्मचारी वर्ग याबाबत आढावा घेतला. तसेच गर्दी कमी होण्यासाठी रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहत, सणसवाडी, शिक्रापूर येथील कंपन्यांनी कामगार वर्गाला सुट्टी जाहीर करावी, असे डॉक्टरांनी बैठकीत सांगितले.