आळंदीकरांचा सवाल : फिरत्या स्वच्छतागृहाची आग विझवण्यासाठी पाऊण तासाने आले
आळंदी – आळंदीत स्मशानभूमीजवळ दोन फिरते स्वच्छतागृह वाहन बंद आवस्थेत गेले अनेक वर्षांपासून पडून आहे. त्या वाहनाला रविवारी (दि. 10) दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. दरम्यान, आळंदी, पिंपरी-चिंचवड येथील अग्निशमन बंब वेळेवर न आल्याने अग्निशामक विभागाला घटनेचे गांभीर्य नाही का? असा संतप्त सवाल उपस्थितांनी उपस्थित केला.
फिरत्या स्वच्छतागृह गाडीला आग लागली त्यावेळी तेथे जवळच असणाऱ्या गंगाधर मिसाळ यांनी अग्निशमन विभागाच्या 101 नंबरला संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी पिपरी-चिंचवड अग्निशमनचा नंबर दिला. त्यांनी पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभासगाला फोन केला त्यावेळी त्यांना गाडी यायला वेळ लागेल, तुम्ही आळंदी अग्निशमन विभागाला संपर्क करण्यास सांगितले. तोपर्यंत त्याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. त्यातील एका युवकाने आळंदी अग्निशमन दलाला संपर्क केला असता. अग्निशमन वाहन चालक यांनी गाडीन आणता स्वत:च घटनास्थळी आले व आग कोठे लागली कशाला लागली याची पाहणी केली आणि तेथून निघून गेले. त्यामुळे नाईलाजस्तव तेथील युवकांनी बादलीने पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक युवक प्रसाद बोराटे आणि अमित घुंडरे यांनी अग्निशमनचे अधिकारी शिरगिरे तिथे आले असता त्यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस जोग महाराज शताब्दी महोत्सव कार्यक्रमास आले असल्यामुळे अग्निशमन गाडी तिकडे बंदोबस्तासाठी गेली असून वाहतूककोंडीत अडकल्यामुळे गाडी यायला वेळ लागेल. साधारणतः सव्वाचारच्या सुमारास अग्निशमन वाहन तिथे आले आणि आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर, अग्निशामक अधिकारी शिरगिरे व नागरिक उपस्थित होते.
आगीचे कारण अस्पष्ट
आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नसले तरी वाहन पूर्ण जळून खाक झाल्यामुळे खूप नुकसान झाले आहे. यापूर्वी ही असे आगीचे अनेक प्रकार घडले असता वाहन वेळेवर येत नाही यात अग्निशमन दलाचा हलगर्जीपणा यावरून लक्षात येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.