सातारा – साताऱ्यात सध्या तीव्र गारठा आणि ढगाळ हवामानामुळे विचित्र वातावरणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. सोमवारी शहरात काही काळ पावसाच्या थेंबांनी हजेरीही लावली. त्यामुळे ढगाळ हवेतील गारठ्याच्या विचित्र बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.
पहाटेचे दव आणि सकाळचा गारठा यामुळे सकाळी फिरावयास बाहेर पडणाऱ्यांना कानटोपी आणि स्वेटर घालून बाहेर पडावे लागत आहे. दुपारी अगदी अल्पकाळ उन पडले. मात्र,त्याची तीव्रता जाणवत नव्हती. त्यामुळे गारठा कमी होत नव्हता. खोकला, सर्दी व तापामुळे नागरिक त्रस्त असून वातावरणातील कमालीच्या बदलामुळे सरकारी व खासगी रुग्णालयातील रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. सोमवारी सकाळी वातावरण ढगाळ होते. काही काळ हलका शिडकावा झाला.
जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावल्याने कांदा, गहू, बटाटे, हरभरा या पिकांवरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. यंदा परतीच्या मान्सूनचा परिणाम थेट नोव्हेंबर महिन्यापर्यंत राहिला होता. डिसेंबरमधील काही दिवसांचा अपवाद वगळता थंडीचा हंगाम जाणवलाच नाही. आता फेब्रुवारीच्या महिन्यात सकाळी व सायंकाळी तीव्र गारठा व थंडगार वारे वहात असल्याने थंडीचा अनुभव येत आहे. साताऱ्यात शेकोटी आणि गप्पांचे फड रात्री उशिरापर्यंत दिसत आहेत. आणखी काही दिवस असेच वातावरण अनुभवायला मिळेल, असे हवामान विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्यास थंड हवामान कारणीभूत ठरते. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला यांच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क अथवा हातरूमाल वापरणे, वैयक्तिक स्वच्छता बाळगणे, जंक फूड टाळून नैसर्गिक आहार घेणे, प्रकृतीच्या तक्रारी जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ठराविक महिन्यांच्या मुदतीनंतर प्रकृतीची तपासणी करावी, असा सल्ला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिला आहे.