मयूर सोनावणे
सातारा – महामार्गावर वाई तालुक्यातील विरमाडे-उडतारेदरम्यानचा सेवा रस्ता गत महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात खचला आहे. मात्र लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. बुधवारी रात्रीच्या यावेळी या सेवारस्त्याने निघालेली कार खचलेल्या रस्त्यात अडकून पडली. सुदैवाने ही कार पलटी झाली नाही, अन्यथा अनर्थ झाला असता. या घटनेमुळे सेवारस्त्याच्या दुरुस्तीसाठी “बळी’पाहिजे आहेत का? असा संतप्त सवाल वाहनधारकांसह स्थानिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.
जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अगदी शिरवळपासून ते कराडपर्यंत जागोजागी मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालीच आहे. त्याचबरोबर सेवारस्त्याचीही दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या महिन्यातच वाई तालुक्यातील विरमाडे ते उडतारे दरम्यानचा सेवारस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. दररोज थोड्याथोड्या प्रमाणात खचणारा हा रस्ता सध्या अक्षरश: पाच ते सहा फुटापर्यंत भेगाळला आहे. विशेष म्हणजे टोलनाका परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल असल्याने याठिकणी वाहनधारक चहा-नाष्टा, तसेच जेवणासाठी थांबत असतात व त्यानंतर उडतारेपर्यंतचा प्रवास सेवारस्त्याने करत असतात. या सेवारस्त्यावर अवजड वाहनांचीही मोठी वाहतूक असते.
सध्या हा सेवा रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने अपघाताची शक्यता निर्माण झालीच आहे. शिवाय लवकरात लवकर या सेवा रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास महामार्गालाही तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे वाहनधारकांसह स्थानिकांमधूनही या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. परंतु, लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागानेही या सेवा रस्त्याच्या दुरुस्तीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. बुधवारी रात्री सेवा रस्ता खचल्याची माहिती नसल्याने एक कारचालक या सेवा रस्त्याने निघाला होता. खचलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याची कार अडकून पडली. सुदैवाने ही कार पलटी झाली नाही अन्यथा अनर्थ घडला असता. या घटनेमुळे स्थानिकांसह वाहनधारकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही लक्ष घालून तात्काळ या सेवा रस्त्याची दुरुस्ती करुन वाहनधारकांचा प्रवास सुखकर करण्याची मागणी होती आहे.