बॉलीवूडचा सदाबहार नायक देव आनंद यांनी आपल्या “रोमान्सिंग विद लाईफ’ या आत्मचरित्रामध्ये राजकारणाशी संबंधित एक आठवण लिहिली आहे. इंदिरा गांधींनी देशामध्ये आणीबाणी लादली तेव्हा अनेक जणांची धरपकड करण्यात आली होती. त्यावेळी देव आनंद हे संजय गांधींच्या जवळच्या व्यक्तींच्या निशाण्यावर असायचे.
देव आनंद यांनी आणीबाणीच्या विरोधात आकाराला आलेल्या जनता पार्टीला पाठिंबा दिला. 1977 मध्ये जेव्हा केंद्रामध्ये जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले तेव्हा देव आनंदही त्यांच्यासोबत होते. तथापि, अल्पावधीतच जनता सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले. अंतर्गत संघर्ष विकोपाला जाऊ लागले. ते पाहून देव आनंद यांनी निर्धार केला की आता इथून पुढच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही.
त्याऐवजी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निश्चयही त्यांनी केला आणि तो प्रत्यक्षातही आणला. संजीव कुमार, धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा आणि हेमामालिनी यांच्यासह बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेतील काही कलाकारांना सोबत घेत नॅशनल पार्टी ऑफ इंडिया (एनपीआय) या पक्षाची स्थापना केली होती. या पक्षाचे अध्यक्ष म्हणून स्वतः देव आनंद यांचीच निवड झाली होती. एनपीआयची पहिलीवहिली रॅली 1979 मध्ये मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर निघाली होती.