मानसा, मानसा कधी व्हशीन मानूस’, असं बहिणाबाई म्हणून गेल्या आहेत. ते तर अगदी खरं आहे. मला राहून राहून नवलवाटतं ते अशाच एका गोष्टीचं. माणूस हुशार झाला, विद्वान झाला पण शहाणा झाला नाही- हे असं का? मनुष्याचा उदय सर्वसाधारणपणे 20 ते 30 लाख वर्षांपूर्वी झाला. म्हणजेच तेव्हाच्या रानटी मानवापासून ते आजच्या अत्याधुनिक साधनांचा वापर करणाऱ्या, अवकाशात भ्रमण करणाऱ्या मानवाच्या प्रगतीला तब्बल 20-30 लाख वर्षे लागली.
अर्थात् खरी वैज्ञानिक प्रगती गेल्या तीनएकशे वर्षांचीच असली तरी एवढी जबर इन्व्हेस्टमेंट करून मिळवलेल्या प्रगतीमुळे माणसाचा अहंकार निसर्गाप्रती अंध होण्याइतका वर्धित व्हावा? मनुष्य निसर्गाशी उद्दामपणे का वागू लागला आहे? मी माणूस शहाणा झाला नाही, असं म्हणतो कारण त्याच्या अहंकारी आणि बेदरकार वागण्यामुळे त्याचंच नुकसान होत आहे, हे त्याच्याच कसं लक्षात येत नाहीये?
व्हाइस नावाच्या माध्यमानं प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार नजीकच्या काळातच म्हणजे 2050पर्यंत मानवी संस्कृती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते 2100 सालापर्यंत ही पृथ्वी मनुष्याला राहण्या लायक राहणार नाही. याचाच अर्थ मनुष्य जात तर नष्ट होईलच पण हळूहळू संपूर्ण जीवसृष्टीचा नाश होऊन आपला सुंदर नीलग्रह मंगळाप्रमाणे जीवशून्य, ओसाड आणि भकास होऊन जाईल.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला कारणीभूत मानव आणि केवळ मानवच असेल. वसुंधरेच्या इतिहासात आजपर्यंत अनेक प्रजाती विलयाला गेल्या पण त्याला हिमयुगाचा उदय किंवा उल्कापात यांसारखी नैसर्गिक कारणं होती. आता होऊ घातलेल्या सर्वनाशाला मात्र मानवच उत्तरदायी असेल.
अलीकडील काही वर्षांत आपण विविध महासंकटांचा सामना करीत आहोत. मुळात या महासंकटांचं उगमस्थान कुठे आहे हे पाहावं लागेल. आपण कर्बयुक्त इंधनांचा स्वैर वापर गेल्या शतकभरापेक्षा जास्त काळ करीत आहोत. हा वाढता वापर केवळ करोनामुळेच काहीसा कमी झालेला दिसतो. अप्रत्यक्ष रीतीनं करोनासंकट आपल्याला धडाच देत नाही का? कर्बइंधनामुळे भरमसाठ जागतिक तापमानवाढ होत असते. तापमानवाढीमुळे निसर्ग चेकाळल्यासारखा वागताना आपल्याला का दिसून येत नाही? काही ठिकाणी पेटत असलेले अजस्र वणवे तर काही ठिकाणी महाभयानक वादळं.
कुठे धरतीला भाजून काढणारा उष्मा तर कुठे अविरत पडणारा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे नद्यानाले निर्माण करीत असलेला प्रलय. यातूनही चांगला पाऊस झाल्यानं भरमाप पीक येऊनही भाव न मिळाल्यामुळे उत्पादन रस्त्यावर फेकून देण्याच्या घटना या सर्वाला काय म्हणावं? नैसर्गिक संसाधनांची अमानुष कत्तल झाल्यानं काही संकटं येताहेत तर काही व्यवस्थापनाच्या अभावानं होत आहेत. पाहा, लाखो वर्षे नद्या पाणी वाहून समुद्राकडे नेत आहेत पण आपल्याला त्या पाण्याचं व्यवस्थापन आजही जमलेलं नाही.
आणि करोनासारखी रोगराई? हा रोग वणव्यासारखा झपाट्यानं का पसरावा? त्याचं कारण म्हणजे गर्दी आणि गर्दी कशामुळे तर लोकसंख्येत बेसुमार वाढ झाल्यामुळे. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते आहे त्या प्रमाणात सुविधा वाढत आहेत का, या प्रश्नाचं उत्तर “नाही’ हेच आहे. परिणामी भयानक गर्दी आणि त्यामुळे आवर न घालता येणारीजगदव्यापी साथ. अजूनही लोकांना उत्सव, त्यांना आलेलं बकालपण आणि मिरवणुकी यांचा मोह आवरता येत नाही. अरे, ही महामारी ओरडून सांगत आहे की, आता हा बकालपणा सोडा- पण ऐकतो कोण?
विषाणू कदाचित् निसर्गनिर्मित असेलही पण त्याचं महामारीत रूपांतर वारेमाप जनसंख्येमुळे झालं हे नाकारता येणार नाही. वैयक्तिक स्वच्छता शिकवावी लागते, हे आणखी एक दुर्दैव! विषाणू जर मानवनिर्मित असेल तर मग माणसाच्या दुष्ट महत्त्वाकांक्षेबद्दल काय बोलावं? आपल्याच पायावर धोंडा मारण्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. लस शोधून वैज्ञानिकांनी पराक्रम केला हे चांगलं असलं तरी मुळात असा विषाणू निर्माण होऊन पसरू नये याबाबत संशोधन व्हायला हवं.
एवढंच काय, मनुष्य कितीही ज्ञानी झाला तरी शहाणा होत नाहीये. म्हणून “माणसा, माणसा कधी येईल रे शहाणा?’ असं म्हणावंसं वाटतं!
श्रीनिवास शारंगपाणी