नवी दिल्ली – कॉंग्रेसचा असा आरोप आहे की भारतीय जनता पार्टी एक वॉशिंग मशिन आहे. तेथे गेलेले सगळे कलंकित नेते म्हणजे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असे नेते स्वच्छ होउन जातात. केंद्रीय तपास संस्थांकडून विरोधी पक्षांच्याच नेत्यांना टार्गेट केले जात असल्यामुळे विरोधी पक्षांना हा आरोप करण्याची संधी मिळाली आहे.
निवडणुकीत आरोप- प्रत्यारोप होतच असतात. तथापि, वास्तव काय आहे याची पडताळणी केल्यावर विरोधी पक्षांच्या आरोपांना काहीतरी आधार असल्याचे चटकन जाणवते. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला विरोध करणाऱ्या सगळ्यांनीच भाजप वॉशिंग मशिनचा हा मुद्दा उचलून धरला आहे.
लोकसभेच्या २०२४ मधील निवडणुकीत अन्य पक्षातून दाखल झालेल्या मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अनेक नेत्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. नवीन जिंदाल हे त्यातले अगदी अलिकडचे आणि ठळक उदाहरण. त्यांच्या विरोधात सीबीआय आणि ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. तथापि, त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यावर त्यांना या पक्षाने लोकसभेची उमेदवारीही देऊन टाकली.
झारखंडचे माजी अपक्ष मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या असंख्य केसेस आहेत. मात्र त्यांच्या पत्नी गीता कोडा कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आल्या आणि त्यांना पक्षाने लोकसभेचे तिकीट दिले. भाजप केवळ वॉशिंग मशिन नाही, तर पूर्णत: ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन आहे अशी टिप्पणी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही केली आहे.
विरोधाभास दिसतो
जे नेते भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आणि कारवाईची टांगती तलवार असल्यामुळे भाजपमध्ये दाखल झाले त्यांच्यावरच्या केसेस मागे घेतल्या जाणार की घेतल्या गेल्या हे यथावकाश स्पष्ट होईलच. एक बाब मात्र नक्किच अधोरेखित झाली आहे की या लोकांच्या विरोधात तपास करणाऱ्या संस्था अचानक सूस्त होतात. याउलट विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या कारवाईच्या वेळी मात्र त्यांना विजेपक्षा जास्त गती प्राप्त होते. यासंदर्भात एका उदाहरणाकडे लक्ष वेधले जाते.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली मद्य घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचे आरोप झाले आणि आज ते तुरूंगात आहेत. याउलट कॉंग्रेसचे तत्कालीन नेते हिमंता बिस्व सरमा यांची २०१४ मध्ये एका प्रकरणात चौकशी झाली. नंतर ते भाजपमध्ये दाखल झाले व आज आसामचे मुख्यमंत्री आहेत. एवढेच नाही तर संपूर्ण इशान्य भारतातील भाजपचा चेहरा म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या चौकशीचे पुढे काय झाले ते समोरच आले नाही.
एका आघाडीच्या इंग्रजी माध्यमात दिलेल्या बातमीनुसार २०१४ नंतर विरोधी पक्षांतील २५ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. त्यातील २३ जणांनी भाजपचा मार्ग पत्करल्यामुळे त्यांना दिलासा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या २३ नेत्यांमधील १० पूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. चार राष्ट्रवादी कॉंग्रेस तर चार शिवसेनेत होते. तृणमूल कॉंग्रेसचे ३, तेलगु देसमचे २ आणि समाजवादी पार्टी आणि वायएसआरपी यांच्या प्रत्येकी एका नेत्याचा समावेश होतो.