नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने आपचे खासदार संजय सिंह सुमारे ६ महिन्यांनंतर बुधवारी तिहार तुरूंगाबाहेर आले. ही वेळ जल्लोषाची नव्हे; तर संघर्ष करण्याची आहे, अशी भावना त्यांनी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या आपच्या कार्यकर्त्यांपुढे बोलताना व्यक्त केली.
सिंह तुरूंगाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी उत्साहात घोषणाबाजी केली. त्यांच्याशी एका वाहनावर उभे राहून सिंह यांनी संवाद साधला. जेल के ताले टुटेंगे, हमारे सारे नेता छुटेंगे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी सिंह यांना ईडीने अटक केली. त्यांच्याआधी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. तर, अलीकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली.
त्यामुळे ऐन निवडणूक काळात प्रमुख नेते तुरूंगात असल्याने आपच्या कामकाजावर आणि प्रचार मोहिमेवर प्रतिकूल परिणाम निश्चित मानला गेला. अशात जामीन मंजूर होऊन सिंह यांचे तुरूंगाबाहेर येणे आपसाठी दिलासादायक ठरले आहे.