माधव विद्वांस
कोकणपुत्र, निसर्ग कवी माधव केशव काटदरे यांची आज जयंती. या निसर्गकवींची फारशी कोणाला माहिती नाही. पण मातीशी नाते सांगणाऱ्या कविता आजही पाठ्यपुस्तकातून आहेत.गुहाघर तालुक्यातील शृंगारतळी जवळील शीर हे त्यांचे गाव. त्यांचा जन्म 3 डिसेंबर 1892 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथे त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे बालपण शीर या छोट्या खेड्यातच गेले. घरातील वातावरण धार्मिक असल्याने त्यांच्या कानावर स्तोत्र, पोथी-पुराणे, कथा पडत असत. शीर येथील पंतोजींच्या शाळेत त्यांना घालण्यात आले. मात्र शाळा लांब असल्याने जयरामपंत काटदरे यांच्याकडे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तेथे त्यांनी स्तोत्र, श्लोक, आरत्यांचे पाठांतर केले. तसेच समर्थ रामदास, अक्कलकोट स्वामी यांची चरित्रे व साहित्य त्यांच्या वाचनात आली.
प्राथमिक शाळेत असतानाच त्यांच्यातील कवित्वाची चुणूक दिसून आली. ते तिसरीत असताना त्यांच्या एका मित्राने वर्गशिक्षकांना माधव कविता करतो असे सांगितले, कुतूहल म्हणून त्यांनी माधवला बोलवून घेतले व सांगितलेल्या गोष्टीवर काव्य करण्यास सांगितले.छोट्या माधवाने लगेचच यमक जुळवून कविता सादर केली, ही त्यांची कवी म्हणून पहिली ओळख. वर्ष 1905 मध्ये असगोली गावातील मुलीशी त्यांचा विवाह झाला. पण काही दिवसांनी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला. 1908 ते 1911 या काळात ते इंग्रजी शिक्षणासाठी रत्नागिरीला आले.
तेथे कवी केशवसूत, बालकवी, रे. टिळक, चंद्रशेखर, बी. विनायक आदी आधुनिक कवींच्या कविता त्यांच्या वाचनात आल्या. शाळेतील कार्यक्रमामध्ये ते अनेकदा आपल्या कविता सादर करीत असत.त्यांच्या निरोपाच्या कविता शिक्षकांच्या बदली किंवा सेवानिवृत्तीनंतर कार्यक्रमामध्ये सादर व्हायच्या. 1911ला ते रत्नागिरी हायस्कूलमधून शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते नोकरीसाठी मुंबईला गेले व एका इंग्रजी शाळेमध्ये शिक्षक म्हणून हजर झाले. पगार कमी असल्याने ते नोकरीच्या प्रयत्नात होते. दरम्यान त्यांना कस्टम खात्यामध्ये नोकरी मिळाली. आयुष्यातील बराच काळ त्यांचा मुंबईतच गेला. निवृत्तीनंतर मात्र ते चिपळूण येथे स्थायिक झाले.
त्यांच्या कवितेमधून त्यांचे कोकणावर असलेले प्रेम दिसून येते. त्यांच्या कवितेमधून कोकणच्या सौंदर्याची अनुभूती येते. कवितांमधून त्यांनी जणू कोकणची चित्रेच रेखाटली असे वाटते.निसर्गाच्या बरोबर त्यांच्या कवितांमधून इतिहासही डोकावतो. “ध्रुवावरील फुले’, “फेकलेली फुले’ हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. माधवांची कविता व गीतमाधव हेही त्यांच्या कवितांचे संग्रह आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, सवाई माधवराव, मस्तानी अशा विविध व्यक्तिरेखांवर त्यांनी कविता केल्या. इतर विषयांवर ते कविता करत असले तरी निसर्ग हाच त्यांच्या कवितेचा गाभा होता. कवी माधव यांचे साहित्यातून डोंगरातला काका, पऱ्यांची देणगी, सांजवातीच्यावेळी, तिघे प्रवासी, गाढव जावई, शालिवाहनाची कथा, तीन लढाऊ प्राणी, तीन रणयोद्धे, समुद्रातील महासर्प ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची 41 कडव्यांची 82 ओळींची हिरवे तळकोकण ही कविता आहे. कोकणाचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या या कवीचे 3 सप्टेंबर 1958 रोजी निधन झाले.