धोनीबाबत गांगुलीचे कानावर हात
मुंबई: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या बाबत निर्णय झाला आहे, आमचं ठरलय, असे सांगणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने एका दिवसात पलटी मारताना तो पुनरागमन कधी करणार ते धोनीलाच विचारा असे सांगून कानावर हात ठेवले आहेत. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरूद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यानंतर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे.
तो संघात कधी परतणार हा प्रश्न सध्या सातत्याने विचारला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंडळाच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना गांगुलीने धोनीबाबत आमचं ठरलय, असे सांगतिले होते, मात्र त्याला 24 तासही होत नाहीत तोपर्यंत गांगुलीनेच हा मुद्दा खोडून काढताना धोनीलाच विचारा असे सांगून चेंडू धोनीच्या कोर्टात ढकलला. विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघाने वेस्ट इंडीज दौरा, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध मालिका खेळली मात्र या तीनही मालिकांमधून धोनीने विश्रांती घेतली होती. त्यामुळे आता तो पुनरागमन कधी करणार हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. धोनी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होणार का, असे विचारले असता गांगुलीने याबाबत धोनीलाच विचारा असे उत्तर दिले.
पुन्हा येणार पिंचहिटर
भारतीय क्रिकेट संघात 1990 च्या दशकाची आठवण येणार आहे. सलामीच्या फलंदाजांचे लवकर बळी गेल्यावर संघाचा डाव सावरताना आक्रमक फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्यासाठी पिंचहिटर म्हणून एखाद्या फलंदाजाला फलंदाजीत बढती देण्यात यायची, असाच पिंचहिटर आगामी मालिकामध्येही दिसणार आहे.
कर्णधार विराट कोहलीनेच याबाबत संकेत दिले आहेत. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्या विरुद्धच्या मालिकांमध्ये भारताने विजय मिळविला. त्यात सलामी तसेच मधल्या फळीतील फलंदाजांनंतर तळात रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा यांच्याबरोबरीने वेगवान गोलंदाज उमेश यादव याने देखील आपल्या फलंदाजीतील कर्तृत्वाचे दर्शन घडविले. त्याची आक्रमक फलंदाजी पाहुन कोहलीच नव्हे तर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री देखील प्रभावीत झाले होते. हाच धागा पकडत कोहलीने उमेशवर पिंचहिटरची जबाबदारी सोपविली जाण्याचे संकेत दिले आहेत. संघाचे सलामीवीर लवकर बाद झाले तर उमेशला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविले जाणार असल्याचे कोहलीने मत व्यक्त केले आहे.
संघात फिरकी गोलंदाजाबरोबर एकूण 5 गोलंदाज खेळविले गेले तर एक फलंदाज कमी करावा लागतो. आश्विन आणि जडेजा संघात असल्यावर सातव्या क्रमाकांपर्यंत फलंदाजी मजबूत असते. उमेश यादवने या तिनही मालिकांमध्ये आपले फलंदाजीतील कौशल्य ज्या पद्धतीने सिद्ध केले आहे, ते पाहता त्याला फलंदाजीची जास्तीतजास्त संधी द्यायला पाहिजे. तो निश्चितच यशस्वी होईल, असेही कोहलीने म्हटले आहे.