राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान
निवृत्तीनगर – भारतीय शुगर या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखर धंद्यासाठी काम करणाऱ्या प्रथितयश अशा संस्थेकडून श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ठ ऊस विकासाबद्दलचा राष्ट्रीय पातळीवरील संपूर्ण देशातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार नॅशलन शुगर इन्स्टिट्युट कानपूरचे संचालक नरेंद्ग मोहन यांच्या हस्ते व भारतीय शुगरचे मुख्य संपादक आणि संस्थापक चेअरमन विक्रमसिंह शिंदे तसेच साखर उद्योगातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे नुकताच प्रदान करण्यात आला. विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर, व्हाइस चेअरमन अशोक घोलप व संचालक मंडळातील सदस्यांनी आणि अधिकारी वर्गाने तो स्विकारला.
शेरकर म्हणाले, श्री विघ्नहर कारखान्याने गत वर्षीच्या हंगामात उत्कृष्ट अशा ऊस विकास यंत्रणेचा वापर करून उसाचे एकरी उत्पादनामध्ये आघाडी घेत संपूर्ण पुणे जिल्ह्यात उच्चांकी असे प्रथम क्रमांकाचे म्हणजेच 10 लाख 75 हजार 075 मे. टन इतक्या उसाचे गाळप केले. त्यापासून 12 लाख 53 हजार 920 क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे. त्याचबरोबर 11.65 टक्के साखर उतारा राखण्यात यश मिळविले. विघ्नहरकडून ऊस विकास व संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना तसेच उसाचे एकरी उत्पादनात वाढ होण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुरवित असलेल्या सोईसुविधा, सवलती व उत्पादन वाढीसाठी देत असलेल्या प्रोत्साहन आदि बाबींचा विचार होऊन विघ्नहर कारखान्यास हा पुरस्कार प्रदान केला.भारतीय शुगर या संस्थेकडून संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ठ ऊस विकासाबद्दलचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे श्री विघ्नहरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर व माजी चेअरमन स्व. सोपानशेठ शेरकर यांच्या आर्दशाप्रमाणे विघ्नहरची यशोपताका उंचावली जात असल्याचे शेरकर यांनी सांगितले.