अजित पवारांना देवगिरी, तर अशोक चव्हाण यांना मेघदूत
मुंबई : ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले आहे. मात्र तत्पूर्वी मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप झाले आहे. गेल्या महिन्यात चार मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप झाल्यानंतर, आता विस्तारानंतर सर्वांना बंगले मिळाले आहेत.
सरकारी बंगले वाटपानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला देवगिरी बंगला आला आहे. तर अशोक चव्हाण यांना मेघदूत, दिलीप वळसे-पाटील यांना शिवगीरी, अनिल देशमुख यांना ज्ञानेश्वरी, डॉ. राजेंद्र शिंगणे-सातपुडा आणि राजेश टोपे यांना जेतवन हे बंगले मिळाले आहेत.
ठाकरे सरकारमधील पहिल्या विस्तारात शपथ घेणाऱ्या सर्व 36 जणांना सरकारी बंगल्यांचे वाटप झाले आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा, तर छगन भुजबळ यांना रामटेक, जयंत पाटील यांना सेवासदन आणि एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन हे बंगले मिळाले आहेत.
सत्ताकेंद्र असलेल्या “मातोश्री’वर राहणारे आदित्य ठाकरे यांना अ-6 निवासस्थान मिळाले आहे. बच्चू कडू यांना रॉकिहिल टॉवर 1202, विश्वजीत कदम यांना निलांबरी 302, सतेज पाटील यांना सुरुची-3, आदिती तटकरे यांना सुनिती -10 हे निवासस्थान मिळाले आहे.