मुंबई – राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने अनेक जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विद्यमान राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेसचे एक शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे, अशी माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्यात यावी या मागणीसाठी विरोधकांकडून राज्य सरकारवर दबाव आणला जात आहे. तसेच विरोधी पक्षनेते अजीत पवार यांच्यानंतर शिवसेना आणि कॉंग्रेसनेही सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कॉंग्रेसचे प्रमुख नेते नाना पटोले हे अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या मागणीसाठी राज्यपालांना भेटणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवही सडकून टीका केली.
नाना पटोले म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळत नसेल तर सरकार काय करत आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. कित्येक दिवसांपासून शेतकरी मदतीविना असल्याने तो टोकाचे पाऊल उचलत आहे. यामुळे हे सरकार बरखास्त करण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुजरातला प्रकल्प जाणे थांबले होते. त्यामुळेच मोदी-शहा यांनी ईडीचा वापर करून हे सरकार पाडून गुजरातच्या तालावर नाचणाऱ्या कळसूत्री बाहुल्यांचे सरकार आणले. राज्यात सरकार बदलल्यापासून केवळ तीन महिन्यांत वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, टाटा एअरबस हे मोठे प्रकल्प गुजरातला गेले.
काही दिवसांपूर्वी टाटा एअरबसचा प्रकल्प राज्यात येणार म्हणून जाहीरपणे सांगणारे राज्याचे उद्योगमंत्री आता हा प्रकल्प मागील सरकारमुळे राज्याबाहेर गेला, असे खोटे सांगत आहेत. उदय सामंत हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत की गुजरातचे, असा प्रश्न पडतो, असा टोलाही त्यांनी लगाविला.