पाटण – गटशिक्षणाधिकारी नितीन जगपात यांचा अंकुश नसल्याने तालुक्यात प्राथमिक शिक्षकांचा मनमानी कारभार सुरू आहे. संघटनांच्या बैठकांच्या नावाखाली शिक्षक शाळेत कमी व बाहेर जास्त असतात. काही शिक्षक शाळेत तंबाखू, गुटखा खाऊन येतात, असा गंभीर आरोप पंचायत समिती सदस्या सीमा मोरे यांनी केला. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या “नाजूक’ प्रकरणावरही जोरदार चर्चा झाली.
पाटण पंचायत समितीची मासिक सभा सभापती उज्ज्वला जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती राजाभाऊ शेलार, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, विजय चौगुले उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, देशविदेशातील नागरिक आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती दादासाहेब यादव व पत्रकार दादासाहेब कदम यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.
गटशिक्षणाधिकारी नितीन जगताप यांनी शिक्षकांच्या रिक्त जागांचा पाढा वाचला. त्यावरून शिक्षण विभागाच्या कामकाजाबद्दल सदस्य आक्रमक झाले. शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शाळेच्या वेळेत पाटणमध्ये मिरवतात. शाळेत जात नाहीत, असा आरोप सीमा मोरे यांनी केला. गणेवाडी (मल्हारपेठ) येथे पदवीधर शिक्षक नसल्याने पाचवीचा वर्ग कमी करण्यात आला आहे, असे सुरेश पानस्कर यांनी सांगितले. तालुक्यात शिक्षकांचे समायोजन करण्याची मागणी प्रतापराव देसाई यांनी केली. हुंबरळी शाळेत विद्यार्थी संख्या 47 असताना तेथील दोनपैकी एक शिक्षक दोन महिने रजेवर असल्याचे शेलार यांनी सांगितले.
दरम्यान, गटशिक्षणाधिकारी नितीन जगताप यांच्या “नाजूक’ प्रकरणावर सदस्यांनी प्रकाशझोत टाकला. त्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी खुलासा करावा, अशी मागणी संतोष गिरी यांनी केली. मात्र, साळुंखे यांनी जगताप यांची बाजू घेऊन या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवल्याचे सांगितले. मात्र, सभागृहात चर्चा झाल्याने त्या प्रकरणाला वाचा फुटली.
एकात्मिक बालविकास विभागातील अंगणवाडी सेविकांची 11 तर मदतनीसांची 21 पदे रिक्त आहेत. पोषण आहारावर सहा लाख रुपये खर्च करण्यात येत असल्याची माहिती प्रकल्पाधिकारी उज्वल मोरे यांनी दिली. आरोग्य अधिकारी आर. बी. पाटील यांनी सांगितले की, तालुक्यात साथरोगांचे प्रमाण जास्त आहे. हेळवाक येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी शेलार यांनी केली.
ग्रामसेवकांनी नीट काम न केल्याने दोनशे गावांमधील 14 व्या वित्त आयोगाचा निधी परत गेल्याची तक्रार संतोष गिरी यांनी केली. पाटण एसटी आगारात एक शिवशाही बस दाखल झाली असून अजून चार बसेस दाखल होणार आहेत. यावर्षी आगारास 30 लाख उत्पन्न मिळाल्याची माहिती आगारप्रमुखांनी दिली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला जास्त निधी मिळूनही योजनांची कामे बंद असल्याने अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, अशी तक्रारही गिरी यांनी केली.