मुंबई – राज्यपाल नियुक्त १२ विधानपरिषदेच्या जागांबाबत महाविकास आघाडी १२ नावांच्या यादीवर गुरुवारी मंत्रिमंडळात चर्चा करणार आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातील १२ जागा रिक्त होत आहेत. या जागांवर १२ नावांच्या शिफारशीची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवण्यात येईल.
राज्यपाल नियुक्त कोट्यातील १२ जागा रिक्त झाल्या आहेत. यासाठी सध्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार असल्यामुळे या तीन पक्षांच्या प्रत्येकी चार नेत्यांना आमदारकीची संधी मिळणार आहे. परंतु, १२ जागांसाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा लागली आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींमधून राज्यपाल नियुक्त १२ जागांवर विधान परिषद सदस्य म्हणून निवड करण्यात यावी, असा निकष आहे.
शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, युवा सेनेचे राहुल कनाल, विजय करंजीकर, भाऊसाहेब चौधरी, नितीन बानगुडे पाटील आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या नावाची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या यादीत सर्वप्रथम अलीकडेच भाजपाला रामराम करुन आलेले एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, उत्तमराव जानकर, शिवाजीराव गर्जे, आदिती नलावडे, गायक आनंद शिंदे, श्रीराम शेटे यांचा समावेश आहे.
तर, काँग्रेसकडून प्रवक्ते सचिन सावंत, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री नसीम खान यांचा समावेश आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी विधान परिषदेच्या २ जागा रिक्त झाल्यानंतर राष्ट्रवादीने आदिती नलावडे, शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली होती, मात्र त्यावर अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही.