हेमंत महाजन
तालिबानची राजवट अफगाणिस्तानमध्ये आल्यापासून एक मुद्दा पुढे येत आहे, तो म्हणजे येणाऱ्या काळात तालिबान भारताला त्रास देऊ शकतो? तालिबान्यांशी लढण्याकरिता भारत सज्ज आहे का?
अमेरिकन सैन्य तालिबान्यांशी वीस वर्षे लढत होते; पण अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्य फक्त हवेतून लढले. त्यांनी विमान, ड्रोनचा वापर करून युद्ध जिंकण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेने अफगाणिस्तानला आधुनिक शस्त्रांची आणि तंत्रज्ञानाची एक प्रयोगशाळा बनवली होती. वेगवेगळी नवी शस्त्रे यांचं इथे वापर करण्यात आला. मात्र, त्यांची जमिनीवर लढण्याची हिम्मत नव्हती. युद्ध सैनिक लढून जिंकतात. ते अमेरिकेने केले नाही.
अमेरिकेने अफगाणिस्तान आर्मीला आधुनिक शस्त्र दिली, तंत्रज्ञान दिले. साडेतीन लाख अफगाणिस्तान सैन्य तयार करण्यात आले, परंतु त्या सैन्याची लढण्याची इच्छा नव्हती. तालिबानच्या मानसिक, अपप्रचार युद्धामुळे एक सुद्धा गोळी फायर न करता साडेतीन लाख सैन्य हे रणांगणातून पळून गेले. यामुळे अनेकांना वाटते की केवळ पन्नास ते साठ हजार कडव्या तालिबान्यांनी एका महाशक्तीचा पराभव केला.
त्यामुळे तालिबानी काहीही करू शकतात. परंतु भारतीय सैन्य प्रत्यक्ष रणांगणात उतरून लढते आणि याचा अनुभव चीनला गलवानमध्ये आला आहे आणि पाकिस्तानने पाठवलेल्या टोळीवाल्यांनासुद्धा अनेक वेळा आला आहे. भारतीय सैन्याने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधल्या कडव्या पख्तुनी दहशतवाद्यांना अनेक वेळा हरवले आहे.
1947 चे पाकिस्तान युद्ध एक वर्ष चालले. यामध्ये पाकिस्तानने पंचवीस ते तीस हजार टोळीवाले म्हणजेच पख्तुनी यांचा वापर करून काश्मीरवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याच्या पंधरा ते वीस हजार सैन्याने त्यांचा पराभव केला. त्यांचा पाठलाग करत भारतीय सैन्य सध्याच्या पिओकेमध्ये पोहोचले होते.
दीड हजार भारतीय सैनिकांचे रक्त सांडून आपण त्यांचा पराभव केला. 1965चे युद्ध सुरू व्हायच्या आधी पाकिस्तानने सुरू केलेले ऑपरेशन जिब्राल्टर. यामध्ये पुन्हा पख्तुनी/टोळीवाल्यांचा वापर केला गेला. पंचवीस ते तीस हजार कडवे लढवय्ये जनरल हुसेन यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये घुसले. त्यांना दहा वेगवेगळ्या फॉर्सेसमध्ये वाटले गेले होते. भारतीय सैन्याने रक्त सांडून त्यांचा पुन्हा एकदा पराभव केला.
या युद्धामध्ये पाकिस्तानचे सर्वेसर्वा होते फिल्ड मार्शल आयुब खान. 1965च्या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. आयुब खानला आपल्याशी ताश्कंद येथे शांतता करार करावा लागला. 1971च्या युद्धाची सर्वात प्रसिद्ध आठवण आहे, पाकिस्तानी सैन्याचे ईस्ट पाकिस्तान मधले प्रमुख लेफ्टनंट जनरल नियाजी यांचा भारताचे लेफ्टनंट जनरल जगजितसिंह अरोरा समोर पराभव करारावरती सही करतानाचा फोटो.
1980, 1990 ते 2000 च्या दशकामध्ये अनेक वेळा पाकिस्तानने कडव्या तालिबानी दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळा भारतीय सैन्याच्या तरुण अधिकारी आणि सैनिकांनी त्यांचा नायनाट केला. जे जगातल्या महाशक्तींना जमले नाही ते भारतीय सैन्याने वेळोवेळी केलेले आहे. आतापर्यंत काश्मीरमध्ये साडेतीन हजारांहून जास्त तरुण अधिकारी आणि सैनिकांनी बलिदान दिलेले आहे.
तालिबान भारतामध्ये येईल का?
पुढचे काही महिने तालिबान अफगाणिस्तानमध्ये आपली सत्ता मजबूत करण्यामध्ये वेळ घालवेल. सध्या तालिबान म्हणते आहे की आम्ही काश्मीरमध्ये हस्तक्षेप करणार नाही. पाकिस्तानला वाटते की काश्मिरी दहशतवादी फक्त सोशल मीडिया वॉरियर्स आहेत. म्हणून ते पाकिस्तानमधून कडव्या दहशतवाद्यांना पाठवण्याचा प्रयत्न करतात.
सध्या पाकिस्तानमधले पख्तुनी स्वतंत्र राज्याची आणि देशाची मागणी करत आहे. याशिवाय बलुचिस्तान, सिंध, पाकिस्तानी ऑक्युपाय काश्मीरमधून कोणी दहशतवादी बनून काश्मीरमध्ये जायला तयार नाही. पाकिस्तानला दहशतवाद्यांची संख्या कमी पडत आहे. म्हणूनच पाकिस्तान तालिबानला अनेक कडव्या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसवण्यास भाग पाडेल.
भारतीय सैन्याला काश्मीरच्या एलओसीवरती दहशतवादी घुसखोरी थांबवण्यात 90 ते 95 टक्के यश मिळते. मात्र, भारताच्या इतर सीमा खास तर भारत-नेपाळ, भारत-पाकिस्तान, समुद्री सीमांवर अर्धसैनिक दलाने घुसखोरी थांबवणे गरजेचे आहे.
जे दहशतवादी भारतात येतात त्यांच्याविरुद्ध भारतीय सैन्य दहशतवादी विरोधी अभियान राबवते आणि प्रत्येक आठवड्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले अशी बातमी येत असते. नुकतेच 15 ऑगस्टला सैन्याला दिलेले शूरता पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये बहुतेक पुरस्कार हे काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी अभियानात मिळालेल्या यशाकरता आहेत. त्यामुळे तालिबान्यांचा विनाकारण बाऊ नको.
युद्धामध्ये दोन घटक असतात. एक असते सैनिकांची शस्त्रे आणि दुसरे शस्त्र वापरणारे सैनिक. अफगाणी हरले कारण त्यांची शस्त्रे अत्याधुनिक होती परंतु ते वापरणारे सैनिक हे लढायला तयार नव्हते. भारताचे त्याच्याविरुद्ध आहे. आपली शस्त्रे आधुनिक नसतील परंतु सैनिक आणि तरुण अधिकारी काश्मीरचे रक्षण तालिबान्यांपासून करण्याकरता नक्कीच समर्थ आहेत.
मात्र, महत्त्वाचे आहे की सगळे राजकीय पक्ष, देशाचे वेगवेगळे घटक आणि जनतेने भारतीय सैन्याच्या मागे उभे राहावे, ज्यामुळे चीन-पाकिस्तान आणि तालिबान समर्थीत दहशतवादाची लढाई जिंकण्यात आपल्याला यश मिळेल.