बेल्हे – “ढेगुजी मेघुजी पाऊस पडू द्या, “आमच्या गावाला भरपूर पाऊस व पीक येऊ द्या’, तुझ्यावाचून सर्व जनता हवालदिल झाली आहे. अशी आर्त साद डोक्यावर शेणाने सारवलेला चिखलाचा गोळा घेऊन बेल्हे (ता. जुन्नर) येथील शेतकरी तुळशिराम डोंगरे यांनी वरुणराजाला घातली आहे.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे जवळपास सर्वच ठिकाणी दाणादाण उडाली होती, “आता थांब रे बाबा’ असे म्हणण्याची वेळ आली होती. त्याच्या उलट परिस्थिति आजअसून अवघा महाराष्ट्र पावसाची चातकासारखी वाट पाहात आहे.
रोहिणी व मृग ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने नदी-नाले, धरणे, बंधारे, विहिरी, कुपनलिका हे पाण्याचे सर्व स्रोत आटत चालले असून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली असून खरीपाच्या पेरण्याही थांबल्या आहेत.
दरम्यान, डोंगरे यांनी संपूर्ण बेल्हे गावातून फेरी मारुन भैरवनाथ मंदिरात शेवट केला असून त्यांच्या भावनिक आर्त हाकेला पर्जन्यराजा कशा प्रकारे प्रतिसाद देईल हे येणारा काळच ठरविल.