Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘राम मांसाहारी होता’ असं वक्तव्य अलीकडेच केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. भाजपच्या नेत्यांनी तर राज्यभरात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केले. तसेच त्यांच्या अटकेसाठी अनेक नेत्यांनी मागणी देखील केली. दरम्यान, या सगळ्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील आव्हाड यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी बोलताना, “जितेंद्र आव्हाड यांनी कोणत्या अवस्थेत ते वक्तव्य केलं, कोणत्या अवस्थेत माघार घेतली, ते पाहावं लागेल. ज्या अवस्थेत ते आधी बोलले ती अवस्था आणि माघार घेतली तेव्हाची त्यांची अवस्था काय होती ते पाहायला हवं. एखादा माणूस शुद्धीत नसल्यावर चुकीचं बोलतो, बेशुद्ध असल्यावर काहीही बरळतो, परंतु, शुद्धीवर आल्यावर खरं कबूल करतो, तसाच हा प्रकार आहे. हे सगळं गोंधळात टाकणारं आहे. असे म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली .
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केले.
दरम्यान, येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. संपूर्ण देशभरात या उत्सवामुळे उत्साहाचे वातावरण आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांचे प्रभू श्री राम मांसाहारी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य पुढे आले आहे.