शेवगाव बेरोजगारी, दारिद्य्र, ढासळती अर्थव्यवस्था या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी मोदी- शहा 370 कलम, नागरिकत्व विधेयक, राममंदिर या गैरलागू मुद्यांवर सर्वांची भलावण करत आहेत. त्यांच्या हुकूमशाहीला इतर पक्ष आता सुरुंग लावण्याच्या तयारीत असून देशात भाजपविरोधात इतर पक्षाच्या ध्रुवीकरणाची ‘महाराष्ट्रातील सरकार’ नांदी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी येथे केले.
येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने आयोजित पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा पॅंटर्न’ या विषयावर ते बोलत होते. व्याख्यान मालेचे हे तिसरे वर्ष आहे.
यावेळी शेवगाव शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी संचालक डॉ. युवराज नरवडे, अर्थतज्ज्ञ नंदिनी आत्मसिध्द, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत शिंदे, काकासाहेब नरवडे, माजी प्राचार्य शिवाजी देवढे, एस.व्ही.कुलकर्णी, कृषक समाजाचे राज्याध्यक्ष बापुसाहेब भोसले आदी प्रमुख मंडळीसह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.देसाई म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षांची युती अभद्र असल्याची टीका भाजप करत आहे. मात्र भाजपला अशी टीका करण्याची नैतिकता शोभत नाही. प्राचार्य डॉ. ओंकार रसाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. रामदास कातकडे यांनी सुत्रसंचालन तर प्रा. राजेंद्र काळे यांनी आभार मानले.