नगर -नगरकरांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी, ही शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची अगदी रास्त आहे. मात्र, त्यातून महापालिकेचे उत्पन्नच बंद होईल. परिणामी कर्मचाऱ्यांच्या पगाराची देखील अडचण होईल. ती दूर करण्यासाठी उपनेते राठोड यांनी सरकारकडून त्यांना मिळणारे फक्त एक वर्षांचे मानधन महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेच्या तिजोरीत जमा करावे, असा सल्ला ज्येष्ठ नेते श्रीराम येंडे यांनी दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवसेना उपनेते राठोड यांनी नगरकरांची यावर्षीची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकेलवार यांच्याकडे केली. त्यासंदर्भात महापालिका उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे राठोड यांनी शिवसेनेतर्फे भूमिका मांडली. लॉकडाऊनमुळे बंद पडलेली बाजारपेठ, त्यातून निर्माण झालेल्या अर्थकारणाच्या अडचणीही सांगितल्या. त्यावर आज ज्येष्ठ नेते येंडे यांनी राठोड यांच्या भूमिकेवर हल्ला चढविला आहे.
एकतर महापालिकेला उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. अशास्थितीत सरकारकडून येणारे वस्तू व सेवाकराच्या निधीतून कर्मचाऱ्यांचा पगार करण्यात येतो. त्यातही महापालिकेला घरपट्टी व पाणीपट्टीतून मिळणारा स्व:हिस्सा द्यावा लागतो. तेव्हा कुठे महापालिकेच्या पगार होतो. साधारण अडीच हजाराच्यावर महापालिकेचे कर्मचारी आहेत. घरपट्टी व पाणीपट्टी बंद झाल्यास त्यांच्या पगाराची देखील मोठी अडचण निर्माण होईल. त्यात पगार नाही म्हणून जर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले तर त्याच आंदोलनासाठी उभारलेल्या मांडवात बसून तुम्ही (उपनेते राठोड) कर्मचाऱ्यांची बाजुही मांडणार. त्यामुळे असा राजकीय दुटप्पीपणा बंद करा, असा सल्लाही ज्येष्ठ नेते येंडे यांनी उपनेते राठोड यांना दिला आहे.
महापालिकेच्या तिजोरीत आधीच खडखडाट आहे. त्यामुळे बहुतांशवेळा नगरकरांना जे पाणी मिळते, त्याचीच वीज खंडीत करण्यासाठी वीज महावितरण कंपनी इशारा देते. त्यामुळे महापालिकेचे अर्थकारण चालले नाही, तर नगरकरांना पाणी देखील मिळणे अवघड होईल, हे लक्ष्यात घ्यायला हवे होते. सध्या देशाची, राज्याची अर्थिकस्थिती अत्यंत नाजूक आहे. तिजोरीत पैसे कमी पडले म्हणून अलिकडेच सरकाराला अक्षरश: दारुविक्रीला परवानगी द्यावी लागली. त्यामुळे पैशांचे सोंग करता येणार नाही. असे फुकटचे सल्ले देण्याअगोदर पैसे न मिळाल्यास निर्माण होणाऱ्या अडचणी देखील समजून घ्यायला हव्या होत्या, अशी टिकाही येंडे यांनी राठोड यांच्यावर केली आहे.